
Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर संशयाची सुई पाकिस्तानवर आहे. पाकिस्तानविरोधात भारतानं कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे. युद्धाचे ढग गडद झालेले असतानाच आधीच कंगाल झालेल्या पाकिस्ताननं युद्धाची खुमखुमी दाखवली आहे. पाकिस्ताननं रविवारी आणखी एक क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर ही सलग दुसरी क्षेपणास्त्र चाचणी आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. भारतानं सगळ्याच बाजूने कोंडी केल्यानंतर जगभरातील अनेक देशांकडे मदतीसाठी विनवण्या करणाऱ्या पाकिस्ताननं भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सलग दुसऱ्यांदा क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. रविवारी ही चाचणी केली. या क्षेपणास्त्राची मारा करण्याची क्षमता १२० किलोमीटर असल्याचे सांगण्यात येत आहे.
तत्पूर्वी, पाकिस्ताननं अब्दाली या क्षेपणास्त्राची चाचणी केल्याची घोषणा शनिवारी केली होती. ४५० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता असल्याचे सांगण्यात आले. या चाचणीनंतर पाकिस्तानी सैन्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. सैन्य तत्परता सुनिश्चित करणे, क्षेपणास्त्र अद्ययावत प्रणाली तपासणी; तसेच इतर प्रमुख तांत्रिक मापदंड तपासून बघण्याचा यामागचा उद्देश होता, असं पाकिस्तानी लष्कराकडून सांगण्यात आलं होतं.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत तणाव वाढला आहे. या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानद्वारे करण्यात आलेली क्षेपणास्त्र चाचणी ही चिथावणीखोर कृती आहे, असे भारताचे म्हणणे आहे. नैराश्यात गेलेल्या पाकिस्तानचा हा तणाव वाढवण्याचा प्रयत्न आहे, असंही भारताचं म्हणणे आहे. मात्र, पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र चाचणीवर भारताकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.