मागच्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठे यश प्राप्त झाले आहे. अखेर सरकार हे या झुरळासमोर झुकल असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. काहीही झाले तरी जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तो पर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका सीजेपीने घेतली होती. तरुणांनी आपले आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून प्रयत्न केले. मात्र यामधून कुठलाही तोडगा निघत नव्हता, शेवटी ज्यांना झुरळ म्हणून डिवचल त्यांच्यासमोरच अखेर सरकारला नमते घ्यावे लागले. परंतु आता या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित होत आहे, हे आंदोलन आता संपणार का? सीजेपीचे संथापक अभिजीत दीपके यावर काय भूमिका मांडता हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
खरं तर CJI सूर्यकांत यांनी देशातील तरुणांना झुरळ असे संबोधले होते. यानंतर अभिजीत दीपके यांनी थेट कॉक्रोच जनता पार्टीची स्थापन केली. अवघ्या काही तासांत सोशल मीडियावर कोट्यावधी नागरिकांनी विशेषतः तरुणांनी पाठिंबा दिला. यानंतर अभिजीत दीपके यांनी देशातील प्रमुख शहरांमध्ये आंदोलन केले. सुरुवातीला या आंदोलनाला इतकासा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत दिल्लीच्या जंतर-मंतर या ठिकाणी उपोषण सुरू केले. तसेच संसद भवनवर काढलेल्या मोर्चामध्ये तरूणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले. यानंतर विरोधी पक्षाने एकत्र येत या आंदोलनात सामील झाले. देशभर या आंदोलानाची व्याप्ती वाढत गेली. ठिकठिकाणी विरोधी पक्षांनी तरुणांना पाठिंबा भर पावसात मोर्चा काढला. मोठ्या प्रमाणात सरकारवर दबाव निर्माण झाला आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.
आंदोलनाला यश मिळताच जंतर मंतरवर एकच जल्लोष सुरू झाला. अभिजीत दीपके यांनी यावर प्रतिक्रिया देत जोरदार भाषण केले. या सरकारसमोर आम्ही झुकणार नाही. गरज पडली तर आम्ही राजीनामे घेण्याची ताकद ठेवतो. ही लोकशाही आहे, इथे घाबरण्याचं काहीच कारण नाही. आपण ठामपणे आवाज उठवला, तर हे सत्ताधारी ताळ्यावर येतील आणि ते अत्यंत आवश्यक आहे. काही जण स्वतःला बादशहा समजत आहेत, पण त्यांना हे लक्षात ठेवायला हवं की ते जनतेमुळेच या पदावर आहेत. एक राजीनामा झालेला आहे, पण आमच्या अजून दोन महत्त्वाच्या मागण्या आहेत. हा लढा इथेच थांबणार नाही. व्यवस्था आतून पोखरणाऱ्या प्रवृत्तींचा आम्ही ठाम विरोध करतो.
1. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना किमान १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी.
2. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जची सखोल चौकशी करून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
3. डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा आणि सचिन शर्मा यांनी केलेल्या लाठीमाराबाबत जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
4. २० जुलैनंतर विद्यार्थ्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
मंत्र्यांचा राजीनामा घेऊ शकतो, तर इतर कोणालाही जबाबदारीपासून सूट नाही. न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील. असे अभिजीत दीपके म्हणाले.
दरम्यान काल राज आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. तिरंगा मोर्चा असे या आंदोलनाचे नाव होते. मात्र आता शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता हाच मोर्चा अभिनंदन मोर्चा असणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हा मोर्चा २६ जुलै २०२६, रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पार्क ते श्री सिद्धिविनायक मंदिर असा असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.