
अरविंद केजरीवाल हे दिल्ली ऐवजी दुसऱ्या जागेच्या शोधत आहेत, असा मोठा दावा कॉंग्रेसने केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी कॉंग्रेसने आम आदमी पार्टीवर केलेल्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर केजरीवाल यांनी नवी दिल्ली येथून उमेदवारी अर्ज भरला नाही तर ही आश्चर्याची गोष्ट नसेल असं देखील कॉंग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी यावर भाष्य करताना म्हंटलं आहे. त्यामुळे आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिल्लीच्या राजकारणात काय बदल होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हे भाजपवर विद्यमान मतदारांची नावे हटवून नवी दिल्ली विधानसभेच्या जागेवर नवीन नावे जोडल्याचा आरोप करत आहे. केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत हेराफेरी केल्याचा आरोप भाजपवर करत गुरुवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. केजरीवाल यांचा आरोप आहे की, भाजपशी संबंधित लोकांनी १३ हजार नवीन मतदारांना मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज केले आणि त्यांच्या बाजूने मतदान प्रभावित करण्यासाठी ५ हजार ५०० लोकांची मते रद्द करण्याचा प्रयत्न केला.
या कथित गैरप्रकारांविरोधात केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाकडे गुरुवारी तक्रार केली आहे. तर हे सर्व प्रकरण सुरू असतानाच काँग्रेसने हा दावा केला आहे. याबद्दल कॉंग्रेसचे दिल्लीचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी म्हटलं आहे की, अरविंद केजरीवाल यांना संदीप दीक्षित नवी दिल्लीत आल्यापासून नवी दिल्लीपलीकडे काही दिसत नाही. ते कधी पैसे वाटले जात असल्याचे सांगतात. तर कधी बाहेरच्यांची नोंदणी होत असल्याचे सांगतात. त्यांना दिल्लीची चिंता नाही का?
केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री राहिले आहेत, असं असताना त्यांनी दिल्लीतील प्रत्येकाचा आवाज बनायला हवं. पण त्यांना नवी दिल्लीपलीकडे काहीही दिसत नाही आहे, अशी टीका यादव यांनी केली आहे. तसंच केजरीवाल नवीन जागेच्या शोधात असून त्यांनी नवी दिल्लीतून उमेदवारी न भरल्यास फार मोठी गोष्ट होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर काल अरविंद केजरीवाल यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, ही गंभीर चिंतेची बाब आहे. गेल्या २२ दिवसांत नवी दिल्ली मतदारसंघातील मतदारांची नावे वगळण्यासाठी ५ हजार ५०० अर्ज प्राप्त झाले आहेत. या मतदारसंघात सुमारे १ लाख मतदार आहेत. म्हणजेच ५.५ टक्के मतदारांची नावे वगळण्यासाठी हे अर्ज केवळ २२ दिवसांत दाखल करण्यात आले आहेत. मात्र निवडणूक आयोगाने यापैकी काही लोकांशी संपर्क साधला असता त्यांनी असे अर्ज सादर करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा घोटाळाच आहे, असं केजरीवाल म्हणाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.