

महिला पदाधिकाऱ्याकडून भाजप नेत्यावर गंभीर आरोप
पदाच्या बदल्यात शरीरसंबंध ठेवण्याची केली मागणी
उत्तर प्रदेशातील महोबा येथील घटनेमुळे राजकारणात खळबळ उडाली
या प्रकरणी महिला पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली
उत्तर प्रदेशच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. महोबा येथील भाजपच्या माजी महिला जिल्हामंत्रीने जिल्हा अध्यक्ष मोहनलाल कुशवाहा यांच्यावर गंभीर आरोप केला. 'माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव, तेव्हाच तुला जिल्हा उपाध्यक्ष पद मिळेल', असा दबाव मोहनलाल कुशवाहा यांनी टाकल्याचा आरोप या महिला पदाधिकाऱ्याने केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकारणात खळबळ उडाली. पण जिल्हा अध्यक्ष मोहनलाल यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपली प्रतिमा मलीन करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महिला नेत्याने जिल्हा अध्यक्ष मोहनलाल कुशवाह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. उत्तर प्रदेशच्या महोबातील भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. नवीन जिल्हा कार्यकारी समितीच्या स्थापनेपासूनच पक्षामध्ये असंतोषाची लाट पाहायला मिळाली. पण माजी महिला जिल्हामंत्र्यांनी फेसबुकवर लाईव्ह करत जिल्हा अध्यक्षांवर केलेल्या गंभीर आरोपामुळे आता राजकारणाला वेगळ वळण आले आहे. फेसबुक लाइव्हमध्ये त्यांनी मोहनलाल कुशवाहा यांच्यावर थेट एका पदाच्या बदल्यात शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे.
महिला नेत्याने असाही आरोप केला आहे की, शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यांनी सांगितले की, जेव्ही मी जिल्हा उपाध्यक्षपदासाठी जिल्हाध्यक्ष मोहनलाल कुशवाह यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी जी अट घातली ती ऐकून मला धक्का बसला. जिल्हाध्यक्षांनी मला त्यांच्यासोबत दिल्ली आणि लखनऊला सोबत येण्याचा प्रस्ताव ठेवला. मी नकार दिल्यानंतर त्यांनी मला पक्षातून काढून टाकण्याची धमकी दिली. ही गोष्ट इथेच संपली नाही. त्यांनी असाही आरोप केला आहे की, पक्षाचे दोन वरिष्ठ पदाधिकारी जिल्हा सरचिटणीस आणि जिल्हा उपाध्यक्ष हे देखील जिल्हा अध्यक्षांच्या मागण्या मान्य करण्यासाठी दबाव टाकत होते.
पक्षातून काढून टाकल्यामुळे महिला नेत्या भावुक झाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, त्या गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासोबत एकनिष्ठ होत्या. पण जेव्हा त्यांच्या नवऱ्याला एका खोट्या बलात्कार प्रकरणात तुरुंगवासाची धमकी देण्यात आली तेव्हा त्यांचा संयम तुटला आणि त्यांना फेसबुक लाइव्ह करत आपली व्यथा जनतेसमोर मांडवी लागली. जिल्हा अध्यक्षांच्या त्रासाला कंटाळून महिला नेत्या थेट पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात गेल्या आणि त्यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. पण आता भाजप जिल्हाध्यक्ष मोहनलाल कुशवाहा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचा आरोप त्यांनी केला आहेत. त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर माझ्यावर जे आरोप केले जात आहे त्यामध्ये काही तथ्य नाही. हे फक्त माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे.