

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. संसद भवनात शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमात उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांनी दुपारी सव्वा बारा वाजता नितीश कुमार यांना शपथ दिली. यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अनेक प्रमुख नेते, तसेच बिहारचे दोन्ही उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा हे देखील उपस्थित होते. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार संसद भवनातून थेट आपल्या दिल्लीतील कामराज लेनस्थित निवासस्थानी रवाना झाले.
राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी एक संसदीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. देशभरातील मोजक्या राजकारणी मंडळींच्या मांदियाळीत त्यांच्या नावाचा समावेश झाला आहे. नितीश कुमार यांनी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद या भारतीय लोकशाहीच्या चारही सदनांचे प्रतिनिधीत्व केले आहे.
नितीश कुमार हे राज्यसभेचे खासदार झाल्यामुळे त्यांना बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संसद भवनातून दिल्लीतील निवासस्थानी गेल्यानंतर संध्याकाळी ते पाटणाकडे रवाना होतील. राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर आगामी काही दिवसांत ते बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे नितीश कुमार यांनी काल स्पष्ट केले आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये नवे सरकार स्थापन होईल.
शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतील. या बैठकीत बिहारचे नवे मुख्यमंत्री आणि नव्या सरकारच्या स्थापनेबाबत चर्चा होऊ शकते. तसेच मुख्यमंत्र्यांच्या निवडीसंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीत नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली बिहार भाजपच्या कोअर गटाची एक महत्वपूर्ण बैठक देखील होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार हे १३ एप्रिल रोजी कॅबिनेटची अखेरची बैठक घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात. एनडीएच्या आमदारांच्या गटाची बैठक होईल. त्यात मुख्यमंत्रिपदी कोण असेल आणि नवे सरकार कसे असेल यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. मंत्री विजय कुमार चौधरी यांनीही याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे. नितीश कुमार हे राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील. आणखी दोन-तीन दिवस प्रतीक्षा करा, असे चौधरी म्हणाले होते.