

छत्तीसगड उच्च न्यायालयाने सन २००३ मधील बहुचर्चित रामअवतार जग्गी हत्याकांड प्रकरणात माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचा मुलगा अमित जोगी याला दोषी ठरवलं असून, जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. उच्च न्यायालयाने मागील गुरुवारी अमित जोगी याला या हत्या प्रकरणात दोषी ठरवलं होतं.
मुख्य न्यायमूर्ती रमेश सिन्हा आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार वर्मा यांच्या खंडपीठाने सीबीआयचे अपील स्वीकारून कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला. खंडपीठाने आयपीसीच्या कलम ३०२ (हत्या) आणि १२० बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत दोषी ठरवतानाच, जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असेही निकालात नमूद केलं आहे.
३१ मे २००७ रोजी रायपूरच्या विशेष सीबीआय न्यायालयाने या हत्याकांड प्रकरणी दिलेला निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवून जोगी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अमित जोगी याला विशेष न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष ठरवलं होतं. तर चिमन सिंह, याह्या ढेबर, अभय गोयल, फिरोज सिद्दीकी यांच्यासह अन्य २८ आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते.
उच्च न्यायालयाने हा निकाल देताना महत्वाची टिप्पणी केली. एका साक्षीदाराच्या साक्षीच्या आधारे काही आरोपींना शिक्षा देणे आणि कथित मुख्य सूत्रधाराची निर्दोष सुटका करणे न्यायसंगत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या खटल्याची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू झाली. या सुनावणीत सतीश जग्गीच्या वतीने वकील बीपी शर्मा यांनी गंभीर तर्क न्यायालयासमोर मांडले. हे हत्याकांड त्यावेळच्या राज्य सरकारच्या संरक्षणाखाली रचलेला कट होता. सीबीआय चौकशी सुरू झाली त्यावेळी प्रभावशाली हस्तक्षेपामुळं महत्वाचे पुरावे नष्ट करण्यात आले, असा युक्तिवाद करण्यात आला होता. अशा घटनांमध्ये केवळ भौतिक साक्षी-पुराव्यांअभावी आरोपींना दिलासा दिला जाऊ शकत नाही, तर संपूर्ण कटाचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, हे समजणे आवश्यक आहे, असेही वकिलांनी न्यायालयात सांगितले होते.
४ जून २००३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस नेता रामअवतार जग्गी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण ३१ जणांना आरोपी करण्यात आले होते. बल्टू पाठक आणि सुरेंद्र सिंह हे या प्रकरणात साक्षीदार झाले होते. उर्वरित २८ आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली होती. तर अमित जोगी याची कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती. त्यानंतर रामअवतार यांचा मुलगा सतीश जग्गी याने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सुरुवातीला अमित जोगी याला दिलासा मिळाला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुनर्विचारासाठी उच्च न्यायालयात वर्ग केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.