
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं. या भीषण दुर्घटनेत २०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर टाटा समूहानं पीडितांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. या विमान अपघातातील मृत प्रवाशांच्या नातेवाइकांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, अशी माहिती टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले.
एअर इंडिया- १७१ विमान दुर्घटनेनं अतीव दुःख झालं आहे. या क्षणाच्या वेदना शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या कुटुंबीयांना गमावलं आहे, तसेच ज्यांच्या अगदी जवळच्या व्यक्ती जखमी झाल्या आहेत, त्या कुटुंबीयांप्रती आमच्या सहवेदना आहेत, असं चंद्रशेखरन यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
या विमान दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. त्या जखमींचा उपचारावरील सर्व खर्च टाटा समूहाकडून करण्यात येईल. तसेच त्यांची देखभालही करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे. या दुर्घटनेत बी. जे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या हॉस्टेलचंही मोठं नुकसान झालं आहे. त्याच्या पुनर्निमाणासाठीही टाटा ग्रुपकडून आवश्यक साह्य करण्यात येईल, असेही त्यात नमूद केले आहे.
टाटा समूह या संकटाच्या काळात पीडितांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहे. सर्वांना आवश्यक मदत उपलब्ध करून दिली जाईल, असेही एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले.
अहमदाबाद येथील मेघाणीनगर परिसरात आज, गुरुवारी दुपारी विमान कोसळलं. एअर इंडियाचं हे विमान लंडनला जाणार होतं. मात्र, उड्डाण भरल्यानंतर काही मिनिटांतच मेडिकल कॉलेजच्या एका इमारतीला जाऊन धडकलं. त्यानंतर मोठी आग लागली. परिसरातील इमारतींचंही मोठं नुकसान झालं आहे. तसेच काही जण जखमी झाले आहेत. विमानातील दोनशेहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातग्रस्त विमानातून क्रू मेंबरसह २४२ जण प्रवास करत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.