
उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झाली. यामुळे अनेक गावं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या ढगफुटीमुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं. नागरिकांना जीव वाचवण्यासाठी पळण्याची देखील संधी मिळाली नाही. अनेक घरं, हॉटेल, इमारती अक्षरश: वाहून गेल्या. याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या ढगफुटीनंतर उत्तराखंडमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांचे कुटुंबीय चिंतेत आले आहेत. अनेकांचा संपर्क होत नाहीये. महाराष्ट्रातून देखील अनेक पर्यटक उत्तराखंडमध्ये गेले होते. पुणे जिल्ह्यातले १९ जण आणि सोलापूरमधील ४ तरुण उत्तराखंडमध्ये फिरण्यासाठी गेले होते. हे सर्वजण बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वांशी संपर्क होत नसल्यामुळे त्यांचे नातेवाईक चिंतेत आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेले १९ जण हे आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्दमधील आहेत. या गावातील १९९० सालच्या दहावीच्या बॅचमधील ८ पुरुष आणि ११ महिलांचा एक ग्रुप पर्यटनासाठी १ ऑगस्ट रोजी उत्तराखंडला रवाना झाला होता. या सर्वांचा शेवटचा संपर्क गंगोत्री परिसरातून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आता यातील एकाशी देखील संपर्क होत नाहीये.
काल सकाळी या ग्रुपमधील काही जणांनी गंगोत्रीमधील फोटो आणि स्टेटस शेअर केले होते. मात्र दुपारी त्या परिसरात काही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली. विशेष म्हणजे हा सर्व ग्रुप त्याच भागातच असल्याचे सांगितले जात आहे. काल ग्रुपमधील एका महिलेने तिच्या मुलाला कॉल करून 'आम्ही सर्वजण सुखरूप आहोत.', असे सांगितले होते. मात्र त्यानंतर आतापर्यंत त्यांच्यापैकी कोणत्याही सदस्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
स्थानिक प्रशासन, उत्तराखंड पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा या सर्वाचा शोध घेत असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा करत आहेत. कोणाशीही संपर्क होत नसल्यामुळे या ग्रुपमधील सर्वच सदस्यांची कुटुंबीय चिंतेत आले आहेत. त्यांची मुलं रडून रडून बेहाल झालेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत या सर्व पर्यटकांचा कुटुंबीयांशी संपर्क करून द्यावा यासाठी प्रशासनाला आवाहन केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बेपत्ता झालेल्यांची नावं आणि संपर्क क्रमांकही टाकला आहे.
दरम्यान, सोलापुरातील चार तरुण उत्तारखंडमध्ये गेले होते. काल सकाळी ११ वाजता या तरुणांचा कुटुंबियांशी संपर्क करत गंगोत्री येथे सुखरूप असल्याचे सांगितले होते. पण त्यानंतर त्यांच्याशी काहीच संपर्क होत नसल्यामुळे कुटुंबीय चिंतेत आले आहेत. सध्या सोलापूर जिल्हा प्रशासनाने या चौघांची माहिती मिळवण्यासाठी उत्तराखंड प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय.
तर, नांदेडमधील देखील काही जण उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेले होते हे सर्वजण सुखरूप आहेत. नांदेड येथील वेगवेगळ्या ठिकाणी ११ पर्यटक गेले होते. उत्तराखंडमधील ढगफुटीनंतर हे सर्वजण एकत्र आले आहेत. नांदेडमधील सर्व पर्यटक यमुनोत्री येथे सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हा प्रशासन पर्यटकांशी सातत्याने संपर्क करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.