पुणे : शिवसेना ठाकरे गटाला पुण्यात पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे पुण्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, ठाकरे गट सोडणाऱ्या संपर्कप्रमुखांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. गेल्या २६ वर्षांत म्हणजेच २००० ते २०२६ या कालावधीत शिवसेनेने पुण्यासाठी एकूण नऊ संपर्कप्रमुख नेमले होते. त्यापैकी आतापर्यंत पाच जणांनी ठाकरे यांची साथ सोडली आहे. या पाचपैकी चार जणांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला असून, एक जण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात दाखल झाला आहे.
शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये अनेक नेत्यांनी आपली भूमिका बदलल्याचे दिसून आले. २०२२ मध्ये पक्षात फूट पडल्यानंतर सुरुवातीला रवींद्र मिर्लेकर, अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, डॉ. नीलम गोऱ्हे, बाळा कदम आणि सचिन अहिर हे ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे होते. मात्र, कालांतराने या नेत्यांपैकी काहींनी शिंदे गटाची वाट धरली. सर्वप्रथम गजानन कीर्तीकर यांनी ठाकरे गट सोडला. त्यानंतर काही महिन्यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही आपली निष्ठा बदलत शिंदे गटात प्रवेश केला. आता सचिन अहिर यांच्या निर्णयामुळे पुण्यातील संघटनात्मक समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या चार वर्षांपासून सचिन अहिर यांच्याकडे पुण्याच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी होती. त्यांच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
रवींद्र मिर्लेकर – २००० ते २००६
अरविंद सावंत – २००७ ते २००९
डॉ. नीलम गोऱ्हे – २००९ ते २०१२
गजानन कीर्तीकर – २०१२ ते २०१५
डॉ. अमोल कोल्हे – २०१६ ते २०१९
उदय सामंत – २०१९ ते २०२०
बाळा कदम – २०२० ते २०२१
सचिन अहिर – २०२२ ते २०२६
या सगळ्या घडामोडींमुळे पुण्यातील शिवसेनेच्या राजकारणात मोठे बदल घडत असून, पुढील काळात याचे दूरगामी परिणाम दिसण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.