

नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरात रोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रोड) प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलंय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या दोन्ही टप्प्यांना जुलै महिन्यातच वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या तयारीत आहे.
ऐरोली-काटई उन्नत मार्ग हा मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक मानला जातो. या मार्गाची एकूण लांबी सुमारे १२.७१ किलोमीटर आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर ऐरोली ते डोंबिवली यांमधील अंतर जवळपास १० किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे नागरिकांना प्रवासासाठी लागणारा ३० ते ४५ मिनिटांचा वेळही वाचणार आहे.
संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई ते डोंबिवली हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत करता येणार आहे. त्यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांचा वेळ, इंधन आणि प्रवासाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. याचबरोबर औद्योगिक भागातील मालवाहतुकीलाही या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग-४ असा ३.४३ किलोमीटरचा उन्नत मार्ग तयार करण्यात येतोय. या टप्प्याचं ९२ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झालं असून आता केवळ काही किरकोळ कामं बाकी आहेत. ही कामं देखील अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच पूर्ण होतील. दुसऱ्या टप्प्यात ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोड असा २.५७ किलोमीटरचा मार्ग असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही टप्प्यांचे एकाच वेळी उद्घाटन करून ते नागरिकांसाठी वाहतुकीस खुले करण्याची तयारी एमएमआरडीएकडून करण्यात आली आहे.
हे दोन्ही टप्पे सुरू झाल्यानंतर महापे, शिळफाटा, कल्याण फाटा आणि ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे मुलुंड-ऐरोली पूल, ठाणे-बेलापूर मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग-४ यांच्यामध्ये थेट आणि अखंड जोडणी निर्माण होणार आहे. त्यामुळे दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा प्रवास अधिक जलद होईल. त्याचबरोबर वेळ, इंधन आणि प्रवासावरील खर्चातही बचत होणार आहे. या मार्गामुळे औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतुकीलाही मोठी मदत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान राष्ट्रीय महामार्ग-४ ते काटई नाका या ६.७१ किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचं कामही सध्या सुरू आहे. हा टप्पा पुढील एक ते दीड वर्षांत पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलंय. हा शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ऐरोली ते काटई असा संपूर्ण १२.७१ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. त्यानंतर नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या भागांतील वाहतूक अधिक वेगवान होणार आहे. नवी मुंबई ते डोंबिवली हा प्रवास केवळ १५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.
या दोन्ही टप्प्यांमुळे महापे, शिळफाटा आणि कल्याण फाटा या भागांमध्ये कायम जाणवणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे वाहनांची ये-जा अधिक वेगाने होईल. तसेच मुलुंड-ऐरोली पूल, ठाणे-बेलापूर मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग-४ यांच्यात अधिक जलद आणि अखंड संपर्क निर्माण होणार आहे.
शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे म्हणाले की, "या प्रकल्पाचं काम वेळेत पूर्ण व्हावं आणि कोणताही विलंब होऊ नये, यासाठी आम्ही एमएमआरडीएच्या मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वारंवार आढावा बैठका घेतल्या. तसंच प्रकल्पस्थळी जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. विविध विभागांमध्ये योग्य समन्वय साधल्यामुळेच आज या प्रकल्पाचे पहिले दोन महत्त्वाचे टप्पे जनतेसाठी सुरू करण्याच्या स्थितीत आले आहेत."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.