पश्चिम रेल्वेने १५ ठिकाणी वेगमर्यादा हटवली.
लोकल गाड्या अधिक वेगाने धावणार, प्रवाशांचा वेळ वाचणार.
ब्रिटिशकालीन पूल इतिहासजमा, नव्या आरसीसी पुलांची उभारणी.
आता ९५% गाड्या वेळेवर धावत असल्याचा रेल्वेचा दावा.
मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन म्हणजेच जीवनवाहिनीच आहे. रोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनमधून प्रवास करतात आणि यामुळेच या प्रवासात थोडासाही बदल झाला तरी त्याचा परिणाम थेट सामान्य माणसाच्या जीवनावर होतो. अशातच पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांना दिलासा देणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेने १५ ठिकाणी लागू असलेली वेगमर्यादा काढून टाकली असून त्यामुळे लोकल गाड्या आता अधिक वेगाने धावू शकतील. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या वेगमर्यादा प्रामुख्याने पूल, दुरुस्ती, पुनर्बांधणी आणि ट्रॅकवरील आवश्यक देखभाल कामांमुळे लादण्यात आल्या होत्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने काम सुरू असताना गाड्यांचा वेग कमी ठेवावा लागतो. मात्र आता ही कामे मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाल्याने वेगमर्यादा हटवण्यात आली आहे. परिणामी, पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल तसेच मेल-एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढला आहे आणि गाड्या वेळेवर धावण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
पश्चिम रेल्वेचे अधिकारी सांगतात की, ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल या दरम्यान असलेल्या पूल क्रमांक ५ तसेच कांदिवली जवळील पूल क्रमांक २० आणि ६१ हे ब्रिटिशकालीन स्क्रू ब्रिज आता इतिहासजमा झाले आहेत. त्याऐवजी नवीन, मजबूत आणि आधुनिक आरसीसी पूल उभारण्यात आले आहेत. या कामांदरम्यान काही काळ वेगमर्यादा ठेवावी लागली होती. त्याचप्रमाणे, ऑक्टोबर २०२४ मध्ये गोरेगाव ते कांदिवली दरम्यान सहावी लाईन उभारण्याचे काम सुरू झाले होते. त्या काळात देखील वेगमर्यादा लागू करण्यात आली होती. आता हे काम पूर्णत्वास आल्याने गाड्या पुन्हा पूर्ववत वेगाने धावू लागल्या आहेत.
विशेष म्हणजे, वांद्रे टर्मिनसला जाणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्या पाचव्या आणि सहाव्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मेल-एक्सप्रेस आणि लोकल गाड्यांचा ताळमेळ अधिक चांगल्या प्रकारे बसला असून गाड्यांच्या वेळेवर धावण्यात मोठा फरक पडला आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, लोकल गाड्यांबरोबरच दूरच्या प्रवासासाठी असलेल्या गाड्याही वेळेत धावू लागल्या आहेत.
मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सुधारण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि वेळेवर सेवा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. त्यामध्ये ट्रॅकचे आधुनिकीकरण, नवीन पूल उभारणे, जुन्या पुलांची दुरुस्ती, अतिरिक्त मार्गिका उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे. रेल्वेच्या या प्रयत्नांमुळे लोकल ट्रेन प्रवास आणखी वेगवान आणि आरामदायी होईल, असा विश्वास प्रवाशांनी व्यक्त केला आहे.
- माटुंगा रोड-माहीम (पाचवी लाईन): १५ किमी, ५० किमी आणि १५ किमी ताशी
- माहीम-वांद्रे (पाचवी लाईन): ३० किमी आणि १० किमी ताशी
- वांद्रे टर्मिनस ते सांताक्रूझ: ४५ किमी आणि ४५ किमी ताशी
- अंधेरी यार्ड कॉम्प्लेक्स: ५० किमी ताशी
- सांताक्रूझ ते वांद्रे: ७५ किमी ताशी
- वांद्रे-माहीम: १५ किमी ताशी
- जोगेश्वरी-गोरेगाव: ५५ किमी ताशी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.