संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण: वाढीव वीजबिले, टीओडी मीटर आणि मीटर बदलल्यानंतर उद्भवलेल्या विविध समस्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर आक्रमक झाली आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने आज कल्याण येथील महावितरणच्या तेजश्री कार्यालयात मुख्य अभियंत्यांची भेट घेऊन जवळपास २ हजार नागरिकांच्या तक्रारींसह सविस्तर निवेदन सादर केले.
या निवेदनात नागरिकांना येणारी वाढीव वीजबिले, टीओडी मीटर संदर्भातील संभ्रम, मीटर बदलल्यानंतर वाढलेली बिले, तांत्रिक अडचणी आणि वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध गैरसोयींचा उल्लेख करण्यात आला. प्रत्येक तक्रारीची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करून संबंधित नागरिकांना लेखी स्वरूपात उत्तर देण्याची मागणी मनसेने केली आहे.
तसेच, मनसेने सादर केलेल्या निवेदनावर तातडीने कार्यवाही करून वीज ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही मुख्य अभियंत्यांकडे करण्यात आली. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा देताना सांगितले की, येत्या आठ दिवसांत मागण्यांवर ठोस निर्णय घेऊन कार्यवाही झाली नाही, तर डोंबिवली शहरातील सर्व वीज ग्राहकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची असेल, असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
या निवेदनामुळे वाढीव वीजबिले आणि टीओडी मीटरच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, महावितरण प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे वीज ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.