महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती मंदावली
विदर्भ, कोकण आणि काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
अरबी समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे मान्सूनचा वेग कमी झाला आहे
पुढील ३-४ दिवसांत राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता
Maharashtra Weather Update Today राज्यातील नागरिकांना दिलासा देणाऱ्या मान्सूनच्या प्रगतीला गेल्या दोन दिवसांपासून ब्रेक लागला आहे. महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवास सध्या एकाच भागात थांबला असून, पुढील ३ दिवसांत तो राज्यातील आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकण, विदर्भासह काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान शेतकरी राजा अद्यापही मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे.
सोमवारी मॉन्सून सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्हे पार करत रत्नागिरी, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांपर्यंत व्यापला होता. मात्र त्यानंतर त्याच्या प्रगतीचा वेग मंदावला आहे. सध्या मॉन्सूनची सीमा रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे, सोलापूर तसेच कर्नाटकातील कलबुर्गी, आंध्र प्रदेशातील नांदयाल, तमिळनाडूतील चेन्नई आणि पश्चिम बंगालमधील सिलिगुरी परिसरापर्यंत पोचली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मॉन्सूनपूर्व सरी आणि हलका पाऊस सुरू असला तरी राज्यातील अनेक भाग अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.मात्र, हा पाऊस सातत्याने पडणारा नसून काही ठिकाणी तो वादळी किंवा पूर्वमोसमी स्वरूपाचा असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.
IMD च्या ताज्या अंदाजानुसार, आज विदर्भासह राज्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच पालघर जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून, उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा त्रास आणखी काही दिवस सहन करावा लागू शकतो.
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील अनुकूल परिस्थितीमुळे मॉन्सूनने संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये आणि सिक्कीम व्यापले आहे. पश्चिम बंगालच्या हिमालयीन भागातही मॉन्सून दाखल झाला आहे. मात्र अरबी समुद्रातील अनुकूल वातावरणाचा अभाव असल्याने महाराष्ट्रातील मॉन्सूनची वाटचाल मंदावल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्रातील आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, संपूर्ण तमिळनाडू तसेच छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये मॉन्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.