
राज्यात पावसाने हाहाकार केला असून अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूर येऊन शेतीसह घरांचे नुकसान झाले. त्याचसोबत शेतकऱ्यांची जनावरं देखील दगावली आहेत. यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. सध्या सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पाऊलं उचलत आहे. मंत्र्यांसह नेते नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत. 'सरकार शेतकऱ्यांसोबत असून त्यांना तातडीने मदत केली जाईल. पुढच्या दोन दिवसांत सरकार शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेईल.', अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, 'राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी दौरे केले. शेतकऱ्यांचे संकट खूप मोठं आहे. शेतकरी बोलताना त्याच्या वेदना जाणवत होत्या. गेल्या अनेक वर्षांमध्ये असा पाऊस पडला नाही. संकट मोठं आहे. अशा स्थितीत सरकार खंबीरपणे मागे उभे राहिली. शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभे राहिले आहे. त्यामुळे आजही कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली. संकट मोठं आहे त्यामुळे मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही. जवळपास ६० लाख हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे. पुढील २ दिवसांत संपूर्ण नुकसानीचे आकडे येतील.'
पुढच्या २ दिवसांत सरकार शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेईल अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, 'शेतकऱ्यांना मदत करताना अटी, नियम बाजूला ठेवून मागे उभे राहिले पाहिजे. अतिवृष्टी, संकट येत तेव्हा मदत करणारे आमचे सरकार आहे. फडणवीस, अजित पवार आणि मी दोन दिवसांत शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेऊ. याआधीही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले आहे. आता आलेल्या संकटात पिकाचे नुकसान झाले. जमीन वाहून गेली आहे. पशूधनाचे मोठं नुकसान झालंय. घरे पडली आहेत. जिवितहानी झाली आहे. पाऊस थांबलाय पण नदीच्या प्रवाहामुळे काही घरे पाण्याखाली आहेत. त्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.'
तसंच, 'अशा परिस्थितीमध्ये आम्ही केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाही निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तिघांच्या सहीचे पत्र मोदींना पाठवले आहे. केंद्र सरकार, मोदी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. अनेक योजना केंद्र अन् राज्याने केल्या आहेत. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभे राहील, याची ग्वाही देतो. शेतकऱ्यांना मदत करणं सर्वांचं आपलं कर्तव्य आहे. सरकार मदत करणार आणि शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणार. सर्वांनी शेतकऱ्यांसाठी जी मदत करता येईल ती करावी. शेतकऱ्यांना तात्काळ जीवनआवश्यक वस्तू देण्याची गरज आहे. त्यासाठी गहू, तांदूळ अन् १० हजार देण्याची सुरूवात झाली आहे. सत्ताधारी, विरोधक यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे. मुलांची पुस्तके, वह्या वाहून गेली आहेत. आम्ही गेल्या आठवड्यापासून मदत पाठवण्याचे सुरूवात केली. त्या भागात लोक शेतकऱ्यांना मदत पोहचवत आहेत. शेवटच्या शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत मदत सुरू राहणार आहे.', असे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.