चेतन व्यास
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील तब्बल ७८ शाळांमधील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे या शाळांतील पाण्याचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असता त्यात कॉलीफार्म असल्याचे पुढे आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यावर शिक्षण विभागाने सर्व शाळांना पत्र पाठवत पाण्याच्या टाक्यांचे निर्जंतुकीकरणं करण्याच्या सूचना दिल्या आहे.
पिण्यासह वापरासाठी शाळांच्या परिसरात असलेल्या टाक्यांत पाण्याची साठवण करण्यात येते. पण या टाक्यांची वेळोवेळी स्वच्छता होत नसल्याचे वास्तव आहे. अशातच डिसेंबर २०२४ मध्ये हिंगणघाट तालुक्याच्या वाघोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. विषबाधा नेमकी कशामुळे याची माहिती मिळावी म्हणून या शाळेतील चार ठिकाणच्या पाण्याचे नमूने घेत ते तपासणीसाठी पाठविण्यात आल्यावर चारही नमूने कॉलीफार्म व थमोटॉलरन पॉझिटिव्ह असल्याने विषबाधा झाल्याचे समोर आले होते.
५५४ शाळांमधील पाण्याचे नमुने तपासणी
सदरची बाब गंभीर असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी याची दखल घेत प्रत्येक शाळांमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी नियमित पाठविण्याच्या सूचना संबंधितांना केल्या. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील ५५४ शाळांमधील पाण्याचे नमूने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी तब्बल ७८ शाळांतील पाणी दूषित म्हणजेच कॉलीफार्मयुक्त असल्याचे पुढे आले आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांचे शाळांना पत्र
शाळांतील कॉलीफार्मयुक्त पाणी घटनेला निमंत्रण देणारे ठरत असल्याने जिल्हा प्रशासनासह शिक्षण विभागानेही वेळीच ठोस पाऊल उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रयोगशाळेचा अहवाल येताच शिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळांना पत्र पाठवत शाळेतील पिण्याच्या पाण्याची टाकी नियमित साफ करावी. स्वछता ठेवावी यासह विविध सूचना केल्या आहे. मात्र शिक्षण विभागाचे हे धोरण वऱ्हातीमागून घोड्यासारखं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.