मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र पेटून उठलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला. मुंडेंनी ट्वीट करत कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचं जाहीर केलं. ट्वीटमध्ये त्यांनी वैद्यकीय कारणामुळे राजीनामा देत असल्याचं नमूद केलं. यावरून विरोधक कडाडले. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. तसेच सरकारला धाऱ्यावर धरलं आहे.
राजीनामा घ्यायला ८४ दिवस का लागले?
संतोष हत्या प्रकरणातील फोटो अत्यंत भयानक आहेत. या घटनेला ८४ दिवस झालेत. चार्जशीट समोर आली. त्याचे फोटो सरकारनं पाहिले असतील ना? या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला ८४ दिवस लागले, असं सुप्रिया सुळे म्हणालेत.
धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
धनंजय मुंडेंनी दिलेल्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मोठा दावा केला आहे. तसेच गंभीर आरोप देखील केले आहेत. आरोपी कृष्णा आंधळे फरार होतोच कसा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
'हत्येदरम्यान विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी वाल्मिक कराडला कॉल केला होता. व्हिडिओ कॉल संपल्यानंतर वाल्मिक कराडनं धनंजय मुंडेंना फोन केला. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड संपर्कात होते', असा खळबळजनक दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
धनंजय मुंडे आणि नैतिकता यांची कधी भेट झाली नाही
'मला सरकारला एक प्रश्न विचारायचं आहे. तुम्ही नैतिकता म्हणून राजीनामा दिलाय असं म्हणतात. मात्र, ज्यांनी राजीनामा दिलाय, ते तब्येतीचं कारण पुढे करत आहेत. धनंजय मुंडे आणि नैतिकता यांची कधी भेट झाली नाही', अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.