Maharashtra Loan Waiver List, Punyashlok Ahilyadevi Holkar Yojana : राज्य सरकारने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने'च्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. सहकार विभागाकडून टप्प्याटप्प्याने जाहीर होत असलेल्या गावनिहाय याद्यांमध्ये शेतकऱ्यांची नावे, आडनावे आणि गावांच्या पत्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळत आहेत. त्यामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी अडचणीत आले आहेत. त्याशिवाय, 'आपले सरकार सेवा केंद्रा'वर जाऊन आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) केल्याशिवाय कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होणार नसल्याने शेतकऱ्यांची धावाधाव सुरू झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये अडीच लाख पात्र शेतकऱ्यांपैकी सध्या केवळ २६ हजार शेतकऱ्यांचीच यादी आली आहे. हीच स्थिती राज्यातील इतर बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी बँक खात्यांशी आधार लिंक नसल्याने आणि स्पेलिंगमधील चुकांमुळे हजारो शेतकऱ्यांचे अर्ज रखडले आहेत. अनेक गावांतील पात्र शेतकऱ्यांची नावे शेजारच्या किंवा दुसऱ्याच तालुक्यातील गावांच्या यादीत जोडली गेल्याचे प्रकार समोर आले आहेत.
याद्यांमध्ये नावांचे घोळ; एका गावातील शेतकरी दुसऱ्याच यादीत
सहकार विभागाकडून पाठवण्यात आलेल्या याद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नावांमध्ये आणि आडनावांमध्ये प्रचंड चुका आहेत. उदाहरणार्थ, सोलापूर जिल्ह्यातील सावळेश्वर येथील शेतकऱ्याचे नाव लांबोटी गावाच्या यादीत दिसून आले आहे. अशाच प्रकारच्या चुका राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये समोर येत असल्याने बँक अधिकारी आणि शेतकरी दोघेही त्रस्त झाले आहेत.
सहकार विभागाने स्पष्ट केले आहे की, ज्या शेतकऱ्यांची नावे पात्र यादीत आली आहेत, त्यांनी तात्काळ जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्रात' (CSC) जाऊन आपले आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे.
ज्यांचे नाव यादीत नाही त्यांनी काय करावे?
ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे पण प्राथमिक यादीत नाव आलेले नाही, त्यांनी निराश होण्याचे कारण नाही. अशा शेतकऱ्यांनी 'आपले सरकार सेवा केंद्रात' जाऊन स्वतःचा आधार क्रमांक देऊन आपण योजनेसाठी पात्र आहात की नाही, याची ऑनलाईन पडताळणी करून घ्यावी.
पुढील टप्प्यात येणार उर्वरित याद्या
सध्या राज्यभरात केवळ पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या सहकार विभागाकडून टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपल्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय किंवा बँकेच्या शाखेत जाऊन यादीतील आपले नाव, बँक खाते क्रमांक आणि कर्जाची रक्कम अचूक असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन सहकार विभागाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.