

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम होऊ लागला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून त्यांच्या पाणीपातळीत वाढ होतेय. अनेक ठिकाणी नदीचं पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्याने प्रशासन सतर्क झालंय. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली गेल्याने काही महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलीये.
सध्या इचलकरंजी, रुई, शिंगणापूर, यवलुज आणि शिरोळ इथले बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. या बंधाऱ्यांवरून दररोज मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांची आणि वाहनांची ये-जा होत असते. मात्र पाण्याचा वेग वाढल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने या मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी विविध ठिकाणी तैनात करण्यात आलेत.
कोल्हापूर शहरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे. विशेषतः डोंगराळ भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी पंचगंगा आणि इतर नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असून नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
आज सकाळी कोल्हापूर शहराजवळील राजाराम बंधाऱ्यावरही पाणी आल्याने तो पूर्णपणे पाण्याखाली गेला. धोका असूनही काही बाईकस्वार पाण्यातूनच बंधारा पार करण्याचा प्रयत्न करताना दिसून आलं. वाहत्या पाण्याचा वेग लक्षात घेता हा प्रकार अत्यंत धोकादायक असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय. अशा प्रकारचं धाडस टाळावं आणि जीव धोक्यात घालू नये, असं आवाहन अधिकाऱ्यांनी केलंय.
शिंगणापूर बंधाऱ्यावरही आज सकाळी पाणी आल्याने तो पूर्णपणे पाण्याखाली गेला. तरीही काही नागरिक पाण्यातून मार्ग काढत प्रवास करत असल्याचे चित्र पाहायला मिळालं. ही बाब लक्षात घेत पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी बंदोबस्त वाढवून बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली. तसंच नागरिकांना सुरक्षित पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामान विभागाने पुढील काही तासांतही जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा, पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवरून किंवा पुलांवरून जाण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहन करण्यात आलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.