

राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाआधी COEPमध्ये काँग्रेस-अभाविप कार्यकर्त्यांमध्ये वाद
विद्यार्थिनींना कार्यक्रमासाठी बळजबरीने आणल्याचा अभाविपकडून दावा
काँग्रेसकडून अभाविप कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप
सागर आव्हाड, साम प्रतिनिधी
काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' या पुण्यातील कार्यक्रमाआधी सीओईपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि अखिल विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. विद्यार्थिंनींना जबरदस्तीने राहुल गांधीच्या कार्यक्रमासाठी आणलं जात असल्याचा दावा अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला होता.
तर दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अभविपवर मारहाणीचा आरोप करण्यात आला होता. त्याचदरम्यान एका विद्यार्थिनीच्या व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामुळे राजकीय वातावरण तापलं होतं. आता या विद्यार्थिनीचा नवा व्हिडिओ व्हायरल झालंय. त्यात तिने आपल्याला राजकारणात ओढू नका अशी विनंती केलीय.
मला राहुल गांधी यांनी निरोप पाठवला आहे. त्यासाठी मी त्यांचे आभार मानते, पण मला कोणाला ही भेटायचं नाही. कारण माझी मानसिकता कोणाला ही भेटायची नाही. मला राजकीय फायद्यासाठी वापरू नका मी एक विद्यार्थ्यांनी आहे. माझा राजकारणाशी कुठलाही संबंध नाहीये. या घटनेमुळे आमच्या महाविद्यालयाचे वातावरण खराब झाले आहे. त्यामुळे कृपा करून आमचे महाविद्यालयात राजकारण आणू नका, अशी प्रतिक्रिया या विद्यार्थिनीने दिली आहे. काँग्रेसच्या नेत्यानी दबाव टाकून माझी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोपही या विद्यार्थिनीने केलाय.
दुसरीकडे सीओईपी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये घडलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर निवेदन जारी केले आहे. या निवेदनात विद्यार्थ्यांनी घडलेल्या घटनांची त्यांची बाजू मांडत निष्पक्ष चौकशी आणि सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विद्यार्थिनीने सुरुवातीला दबाव आणि दिशाभूल झाल्यामुळे माध्यमांसमोर एक निवेदन दिले होते. त्यानंतर तिने स्वेच्छेने तिचे आधीचे निवेदन दबावाखाली दिले असल्याचे स्पष्ट करणारा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला.
या व्हिडिओचे चित्रीकरण सुरू असताना, विद्यार्थ्यांच्या आरोपानुसार एनएसयूआयशी संबंधित काही व्यक्तींनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला तसेच विद्यार्थिनीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि तिच्या संमतीने तिला वसतिगृहातील सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर १०० ते २०० जणांचा जमाव, ज्यामध्ये काँग्रेस, युवक काँग्रेस आणि एनएसयूआयशी संबंधित व्यक्ती असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे, वसतिगृह परिसरात दाखल झाला.
या जमावामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांना धमकावल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आपण २० ते २२ वयोगटातील असल्याचे नमूद करत, ३५ ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तींनी वसतिगृह परिसरात येऊन दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या भावनेवर, शैक्षणिक वातावरणावर आणि प्लेसमेंटच्या काळातील मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, सर्व विद्यार्थ्यांना संरक्षण द्यावे तसेच धमकावणे, बेकायदेशीर प्रवेश आणि विद्यापीठातील शांतता भंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.