Pawanraje Nimbalkar Murder Case Verdict : महाराष्ट्राच्या राजकीय आणि गुन्हेगारी विश्वाला हादरवून टाकणाऱ्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडात २० वर्षांनंतर अत्यंत मोठा निकाल समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. माफीच्या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह्य नसल्याचे मत कोर्टाने नोंदवलेय. तब्बल दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या या हाय-प्रोफाइल केसमध्ये कोर्टात नेमका काय युक्तिवाद झाला? आणि न्यायाधीशांनी काय निरीक्षणे नोंदवली? वाचा सविस्तर... (Padamsinh Patil Latest News)
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल अखेर तब्बल २० वर्षांनंतर जाहीर झाला. मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश सत्यनारायण नवानदार यांच्याकडून निकालाचे वाचन करण्यात आले. मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांच्यासह त्यांचे नातलग आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांचे नातू कोर्टात हजर आहेत. तर दुसरीकडे गेल्या २० वर्षांपासून न्यायासाठी लढा देणारे पवनराजेंचे सुपुत्र ओमराजे निंबाळकर आणि त्यांचे कुटुंबीय देखील न्यायालयात उपस्थित होते.
निकाल वाचनाच्या सुरुवातीलाच न्यायाधीश सत्यनारायण नवानदार यांनी एका लोकनेत्याची हत्या होणे ही दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले. तसेच, या प्रकरणाचा निकाल लागण्यास २० वर्षे लागल्याबद्दल त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली. सुरुवातीला या संपूर्ण प्रकरणाचा तपास कळंबोली पोलिसांनी आणि त्यानंतर नवी मुंबई क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र, स्थानिक पोलिसांच्या तपासावर पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा तपास सीबीआय (CBI) कडे सोपवण्यात आला.
सीबीआयने या खटल्यात सुमारे १२७ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच या प्रकरणातील एक आरोपी पारस्मल जैन याला माफीचा साक्षीदार करण्यात आले होते. याशिवाय बॅलेस्टिक रिपोर्ट आणि सीडीआर (CDR) रिपोर्ट देखील आरोपपत्रात जोडण्यात आले आहेत. पवनराजे निंबाळकर यांच्या न्यायासाठी ओमराजे निंबाळकर गेल्या २० वर्षांपासून लढा देत आहेत, तर त्यांचे बंधू जयराजे निंबाळकर हे गेल्या २० वर्षांत झालेल्या प्रत्येक सुनावणीला न्यायालयात जातीने हजर राहिले आहेत.
निकाल वाचन करताना न्यायमूर्तींनी प्रामुख्याने नमूद केले की, हा संपूर्ण खटला माफीचा साक्षीदार (Approver) ठरलेला आरोपी पारसममल जैन याच्या साक्षीवर आणि पुराव्यांवर आधारित आहे. सन २००२ पासून मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली होती, ज्याचे रूपांतर पुढे पूर्व वैमनस्यात झाले. या राजकीय वैमनस्यातूनच जवळपास २० ते २५ लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप न्यायालयात वाचून दाखवण्यात येत आहे.
अंतिम सुनावणी जवळ आली असतानाच्या काळात काही तपास अधिकारी बदलले गेले, ज्यामुळे कायदेशीर प्रक्रियेत बदल होऊन निकालाला एवढा प्रदीर्घ विलंब होत गेला. ही संपूर्ण बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या खटल्यात माफीच्या साक्षीदाराव्यतिरिक्त ओमराजे निंबाळकर आणि धाराशिवमधील काही महत्त्वाच्या लोकांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्याचे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले आहे.
या संपूर्ण खटल्याची मदार पारसमल जैन या 'माफीच्या साक्षीदारावर' (Approver) असल्याचे न्यायालयाने निकाल वाचनात स्पष्ट केले. सीबीआयने सादर केलेले पुरावे, कॉल डेटा रेकॉर्ड (CDR), बॅलेस्टिक रिपोर्ट आणि मुख्यत्वे ओमराजे निंबाळकर व उस्मानाबादमधील (सध्याचे धाराशिव) काही लोकांच्या साक्षी या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. २००२ पासून पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यात राजकीय दरी आणि व्यावसायिक वैमनस्य निर्माण झाले होते. यातूनच ही हत्या झाल्याचे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले होते, ज्याची न्यायालयाने दखल घेतली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास आणि पुराव्यांचा पाया अत्यंत ठिसूळ असल्याचे न्यायमूर्तींनी निरीक्षण नोंदवले. या संपूर्ण खटल्याची मुख्य भिस्त माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या साक्षीवर अवलंबून आहे. मात्र, त्याच्या साक्षीच्या वैधतेवर न्यायालयाने मोठे आक्षेप घेतले आहेत.
पारसमल जैन याला अधिकृत अटक न दाखवता आधी ताब्यात ठेवण्यात आले होते. त्याला १५ दिवस मारहाण करून आणि औषधोपचार नाकारून त्याची कबुली मिळवण्यात आली, जी कायद्याच्या चौकटीत पूर्णपणे अयोग्य आहे, असे न्यायालयाने नमूद केले आहे. पारसमल जैनची सुरुवातीची कबुली आणि त्यानंतर समोर आलेली माहिती यामध्ये तब्बल ३ महिन्यांचे अंतर होते, ज्यामुळे या माहितीमध्ये मोठी विसंगती आढळून आल्याचे कोर्टाने म्हटले.
३ जून २००६ रोजी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काजी हे मुंबईहून उस्मानाबादला (धाराशिव) जात होते. त्यावेळी नवी मुंबईतील कळंबोली येथे त्यांच्या गाडीवर गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडे असलेला हा तपास नंतर सीबीआयकडे (CBI) वर्ग करण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.