विधान परिषदेच्या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष
भाजपचे नंदकिशोर महाजन सर्वात श्रीमंत उमेदवार
अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्याकडे २.२९ कोटींची मालमत्ता
दीपक धांडे यांच्याकडे सर्वात कमी मालमत्ता असलेले उमेदवार
संजय महाजन, जळगाव
राज्यात १८ जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असून अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांची धावपळ पाहायला मिळते आहे. काही उमेदवारांना संधी न मिळाल्याने पक्षांतर्गत नाराजी पाहायला मिळते आहे. दरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून त्यांच्या मालमत्ता, कर्ज आणि शैक्षणिक पात्रतेची माहिती समोर आली आहे. यात भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन हे ४.४८ कोटी रुपयांच्या मालमत्तेसह सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.
नंदकिशोर महाजन यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे २.१७ कोटी रुपयांची शेतजमीन आणि २.३० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. कुटुंबाकडे सुमारे ६५० ग्रॅम सोने असून मुलगा प्रतीक यांच्या नावावर अमेरिकेतील सेंटेंडर बँकेत सुमारे ३४ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
अपक्ष उमेदवार अनिल चौधरी (Anil Chaudhary) यांच्याकडे २.२९ कोटी रुपयांची मालमत्ता असून भुसावळमध्ये पाच व्यावसायिक दुकाने, ७० लाखांचे घर आणि २०.२५ लाखांची स्कोडा ऑक्टाव्हिया कार आहे. मात्र, त्यांच्यावर १.१३ कोटी रुपयांचे कर्ज असल्याची नोंद आहे. तसेच खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात शिक्षा झाल्याचा आणि काही गुन्हे न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे (Sharad Tyade) यांच्याकडे ४६.५२ लाख रुपयांची मालमत्ता असून स्वतःच्या नावावर चारचाकी वाहन नाही. धरणगाव तालुक्यातील शेती आणि जंगम मालमत्तेचा त्यांनी उल्लेख केला आहे. कुटुंबावर कोणतेही बँक कर्ज नसल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे(Reshma Kale) यांच्याकडे ८९.६४ लाख रुपयांची मालमत्ता असून जळगाव पीपल्स बँकेत ३९.५१ लाख रुपयांची मुदत ठेव आहे. त्या पूर्णपणे कर्जमुक्त असल्याचे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे. तर बंडखोर उमेदवार दीपक धांडे यांच्याकडे सर्वात कमी मालमत्ता असून स्वतःच्या नावावर घर किंवा जमीन नाही. त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची रोकड आणि कुटुंबाकडे ७.५ लाखांचे सोने असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांमुळे त्यांच्या आर्थिक स्थिती, कर्जबाजारीपणा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतची माहिती मतदारांसमोर आली आहे. यामुळे निवडणुकीतील चर्चांना उधाण आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.