

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक
मनोज जरांगे ११ व्यांदा उपोषणाला बसले
मनोज जरांगे यांनी आतापर्यंत १० वेळा केलं उपोषण
जरांगेंनी फडणवीस सरकारला दिला इशारा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी आजपासून आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषण सुरू करताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा इशारा देत आणखी काही मागण्या केल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी मराठा बांधवांना आवाहन करत सांगितले की, 'आपली जातच आहे, मराठ्यांची बलाढ्य ताकद दिसली पाहिजे, आता घराबाहेर पडा.' जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत अनेक मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये येत आहेत. पोलिसांनी याठिकाणी मोठा बंदोबस्त वाढवला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२३ ते आतापर्यंत एकूण १० उपोषण केले असून ८ उपोषण आंतरवाली सराटी येथे तर दोन उपोषण मुंबई येथे केले आहे. आता ते पुन्हा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटीमधील हे शेवटचं निर्णायक आंदोलन आहे. यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी कुठे आणि किती वेळा आंदोलनं केली आहेत? ते आपण पाहणार आहोत...
२९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ (१७ दिवस)
ठिकाण: आंतरवाली सराटी, जालना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आंतरवाली सराटीला आले आणि जरांगे यांच्याशी भेट घेऊन उपोषण सोडवले. जरांगे यांनी शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले.
२५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२३ (९ दिवस)
ठिकाण: आंतरवाली सराटी
न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड (निवृत्त), न्यायमूर्ती सुनील शुक्रे (निवृत्त), जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाल आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे शिष्टमंडळ भेटले. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, उदय सामंत आणि अतुल सावे यांनी जरांगे यांना सरकारची भूमिका समजावून सांगितली.
२६-२७ जानेवारी २०२४ (१ दिवस)
ठिकाण: नवी मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "सगेसोयरे" संबंधी मसुदा अधिसूचना जाहीर केल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतले.
१० ते २६ फेब्रुवारी २०२४ (१७ दिवस)
ठिकाण: आंतरवाली सराटी
महाराष्ट्र विधानसभेने मराठा आरक्षण विधेयक (१०%) संमत केल्यानंतर जरांगे यांनी उपोषण स्थगित केले. हे त्यांचे सर्वात दीर्घ उपोषण होते.
८ ते १३ जून २०२४ (६ दिवस)
ठिकाण: आंतरवाली सराटी
राज्य सरकारचे शिष्टमंडळ म्हणून मंत्री शंभूराज देसाई आणि औरंगाबादचे खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगे यांची भेट घेऊन वेळ मागितला. यापूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही भेट दिली होती.
२० ते २४ जुलै २०२४ (५ दिवस)
ठिकाण: आंतरवाली सराटी
राज्य सरकारच्या वतीने मंत्री शंभूराज देसाई जरांगे यांच्या भेटीला आले आणि एका महिन्यात सगेसोयरे मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
१७-२५ सप्टेंबर २०२४ (९ दिवस)
ठिकाण: आंतरवाली सराटी
जरांगे यांनी स्वतः समाजाच्या विनंतीला मान देऊन उपोषण मागे घेतले. ते नंतर उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरला गेले.
२५-३० जानेवारी २०२५ (६ दिवस)
ठिकाण: आंतरवाली सराटी
जालना जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी सहाव्या दिवशी आमदार सुरेश धस बजरंग सोनवणे आणि आमदार प्रकाश साळुंके यांच्या हस्ते उपोषण स्थगित केले. कुणबी प्रमाणपत्र वाटप कक्ष पुन्हा सुरू करण्याचे व गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन मिळाले.
२९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२५ (५ दिवस)
ठिकाण: आझाद मैदान, मुंबई (पहिल्यांदाच मुंबईत)
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती प्रमुख) यांच्यासह मंत्री उदय सामंत, माणिकराव कोकाटे आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे शिष्टमंडळ आझाद मैदानात जरांगे यांना भेटले. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचे जीआर काढल्यानंतर जरांगे यांनी विखे पाटील यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडले.
दहावे उपोषण - ३० मे 2026 सकाळी १० वाजता उन्हात बसून केले, ते पहाटे 1 (31 मे)वाजता उपोषण सोडले,(उपोषण 1 दिवस)सरकारच्या शिष्टमंडळात असलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीमध्ये सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्यावरून ड्राफ्ट देऊन त्याद्वारे शासन आदेश काढण्याचे आश्वासन दिले...
आता मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट २०२६ पासून ११ व्या उपोषणाला बसले आहेत. अंतरवाली सराटीमध्ये त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.