
माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढून घेण्यात आलं आहे.
पावसाळी अधिवेशनात रमी खेळणं आणि वादग्रस्त विधानं यामुळे कोकाटेंवर कारवाई झाली.
मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या सह्याद्री बंगल्यावर बैठक झाली.
महायुती सरकारमधील हा एक मोठा राजकीय निर्णय मानला जात आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या वेळी सभागृहात रमी खेळणं आणि वादग्रस्त विधान करणं माणिकराव कोकाटे यांना भोवलं आहे. वारंवार वादग्रस्त विधान करण्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कोकाटेंवर नाराज होते. आज सकाळपासून सह्याद्री बंगल्यावर याबाबत हालचाल सुरू होती. अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे यांच्यात कोकाटे यांच्यावर निर्णय घेण्यावरून बैठक झाली होती. आता महायुती सरकारनं माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं.
कोकाटे यांच्याकडून कृषीमंत्री पद काढून घेतल्यानंतर आता कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलीय. तर भरणे यांच्याकडील आधी असलेले क्रीडा आणि युवक कल्याण खाते कोकाटे यांच्याकडे देण्यात आले आहे.
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत मोबाईलवर रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी पोस्ट केला होता. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांनी सरकारवर दबाव टाकला होता. परंतु कोकाटे यांचा राजीनामा न घेता फक्त त्यांच्या खात्यामध्ये बदल करण्यात आलाय.
राज्यात शेतकरी संकटात असतानाही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत रमी खेळताना दिसले. असं असतानाही त्यांचा राजीनामा न घेता फक्त त्यांच्या खात्यात बदल करण्यात आला. खाते बदलले ही काही कारवाई आहे का? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. आता रमी खेळाला राज्य खेळाचा दर्जा द्या अशी खोचक मागणीही त्यांनी सरकारच्या निर्णयानंतर केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.