महापालिका निवडणुकीमुळे सर्वच पक्षातील घडामोडीना वेग आला आहे. अशातच नाशिकमध्ये महायुतीत बिघाड झाल्याने शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. 122 जागांवर नाशिक महापालिकेची निवडणूक होणार असून हजारो उमेदवार हे इच्छुक आहे. तसेच सुरुवातीपासून भाजपने शंभर प्लसचा नारा दिल्याने भाजप ही निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याचे संकेत दिले होते.
तर आम्हाला युतीचा कुठलाही प्रस्ताव आला नसून भाजपने मोठ्या भावासारखे वागावे आणि मन मोठे करून आम्हाला हव्या तितक्या जागा द्याव्या असे शिंदे गटाचे नेते अजय बोरस्ते यांनी बोलून दाखवले होते. मात्र शेवटपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये कुठलाही समन्वय दिसला नाही आणि अखेर आज युतीत बिघाड होऊन शिंदेगट आणि अजितदादा हे नाशिकमध्ये एकत्र आले.
माजी खासदार समीर भुजबळ, मंत्री नरहरी झिरवळ आणि शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी समीर भुजबळ म्हणाले, आम्ही 15 दिवस वाट पाहिली पण भाजपकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आम्ही एकत्र आलो. आमची युती निश्चित आहे. शिंदेंची शिवसेना मोठा भाऊ आहे. तसेच आमचे जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आहे.
आनंदराज आंबेडकर यांना सोबत घेणार- नरहरी झिरवळ
राज्यात महायुती म्हणून काम करतोय. नाशिकमध्येही महायुतीमध्ये लढावं अशी इच्छा होती. त्यामुळे आम्ही लहान भाऊ म्हणून मोठ्या भावाकडे वरिष्ठ नेत्यांकडे गेलो. त्यांनी स्थानिक पातळीवर आमदार नेते यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले होते. स्थानिक पातळीवर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला भाजपकडून निरोप नाही म्हणून आम्ही शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जागावाटप आज रात्री आम्ही पूर्ण करू आणि जो निवडून येण्याच्या मेरिटवर असेल त्याला उमेदवारी देणार असल्याचे झिरवळ म्हणाले. तसेच आनंदराज आंबेडकर यांना सोबत घेणार आहे. एकत्र लढण्याची मागणी आम्ही भाजपकडे केली होती पण त्यांची महायुतीसोबत लढण्याची त्यांची इच्छा नव्हती असे नरहरी झिरवळ म्हणाले.
कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी मिळणार- देवयांनी फरांदे
यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाल्यावर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. युतीचे स्वागत करतानाच भाजप सर्व जागांवर सक्षमपणे निवडणुकीला सामोरे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देवयानी फरांदे म्हणाल्या की शिवसेना-राष्ट्रवादीची युती झाली तरी आम्ही मैत्रीपूर्ण लढा देणार आहोत. भाजप सक्षमपणे निवडणुकांना सामोरे जाईल आणि जनतेचा विश्वास पुन्हा भाजपवरच राहील.
शिवसेनेकडून करण्यात आलेली जागांची मागणी अवास्तव होती. मेरिटवर युती करण्याचे सांगण्यात आले होते मात्र ४५ जागांची मागणी करण्यात आली. अचानक चर्चा सुरू झाल्या आणि वेळ गेला. भाजपकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार आहेत असे त्या म्हणाल्या. फरांदे यांनी पुढे सांगितले की या प्रक्रियेमुळे भाजपच्या अधिक कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी मिळणार आहे. आम्ही सर्व ठिकाणी उमेदवार देणार असून जनतेचा कौल पुन्हा भाजपलाच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.