महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण, राज्यात कुठे पाऊस कोसळणार आहे, तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, पुणे, कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात मात्र अद्याप कडाक्याचे ऊन पडू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. राज्यात पुढील पाच दिवस कसे हवामान असेल? कोणत्या जिल्ह्याला काय अलर्ट दिलाय? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात..
मान्सूनची चाहूल अद्याप लागलेली नाही, पण समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेय. त्यामुळे पुढील ५ दिवस काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे (Dry) राहण्याची अधिक शक्यता आहे. भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि वाशीम या जिल्ह्यांसाठी पाऊस किंवा उष्णतेच्या लाटेचा कोणताही इशारा (No Warning) देण्यात आलेला नाही. राज्यात पुढील ५ दिवस हवामान कसे असेल, याबाबत जाणून घेऊयात...
रत्नागिरीत आज विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता आहे. २१ आणि २२ मे रोजी हलका पाऊस पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. तर २३ आणि २४ मे रोजी हलका ते मध्यम पावसाची अधिक शक्यता आहे.
सिंधुदुर्गमध्ये दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे. तर २२ आणि २३ तारखेला वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यत आहे. २४ तारखेला हवामान ढगाळ राहील.
पुण्यात पावसाची शक्यता -
पुणे आणि पुणे घाट क्षेत्रात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. पुणे शहर आणि परिसरात हलका ते मध्यम पाऊस, तर घाट क्षेत्रात हलक्या पावसाची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. २१ आणि २२ मे रोजी पुणे शहर आणि घाट क्षेत्र दोन्ही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. २३ आणि २४ मे रोजी हवामान कोरडे राहील.
सातारा -कोल्हापूर आणि घाट क्षेत्र:
कोल्हापूर आणि घाट माथ्यावर पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २२ ते ३४ या तीन दिवसात हल्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
सातारा आणि सातारा घाट क्षेत्रातही २० ते २२ मे यादरम्यान साताऱ्यात आणि घाट माथ्यावर हलक्या पावसाची शक्यता आहे. २३ व २४ मे रोजी साताऱ्यात हवामान कोरडे राहील, पण घाट क्षेत्रात दोन्ही दिवस हलका पाऊस सुरूच राहील.
ठाणे आणि रायगड अन् पश्चिम महाराष्ट्रात कसं असेल हवामान
ठाणे आणि रायगडमध्ये पुढील २ दिवस हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर रायगडमध्ये पुढील ४ दिवस विजांच्या कडकटासह वादळी पावसाची शक्यता आहे.
नाशिक, अहिल्यानगर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण राहील, तर उद्या तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील ४ दिवस हवामान कोरडे राहील.
लातूर आणि धाराशिवमध्ये पुढील २ दिवस पावसाची शक्यता आहे. त्यानंतर हवामान कोरडे राहील असा अंदाज आहे.
महाराष्ट्रात कुठे कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा (Heat Wave)
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट आणि रात्रीच्या कडक उन्हाचा (Warm Night) इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ, अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यात ३ दिवस काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट (Severe Heat Wave) येण्याची शक्यता आहे. त्यानंतर उष्णतेची लाट काही प्रमाणात ओसरेल, मात्र तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहील. चंद्रपूर आणि नागपूर या दोन ठिकाणी पाचही दिवस उष्णतेच्या लाटेची (Heat Wave) स्थिती कायम राहण्याची अधिक शक्यता आहे. बुलढाण्यात पुढील २ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर बाकी दिवस धोक्याची सूचना नाही.