राज्यात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा
६ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी
गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान
शेतकऱ्यांकडून तातडीच्या मदतीची मागणी
राज्यात तापमानाचा पारा घसरल्याने तसेच कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आज महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अवकाळीमुळे परभणी,नाशिक,धाराशिव,नांदेड,बीड,बुलढाणा,सोलापूर,जालना या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने हंगामी पिकांचं नुकसान झालं असून बळी राजा हवालदिल झाला आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस गारपिटीने बळीराजा हवालदिल झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सलग २ दिवस पाऊस व गारपीट झाल्याने गहू,द्राक्ष,कांदा पिकाला फटका बसला आहे. मनमाड परिसरात दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होत असल्याने काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी पहाटे पासून गहू काढणीच्या कामाला लागला आहे. मशीनच्या साह्याने गहू काढला जात असला तरी गहू काढणी यंत्र वेळेवर उपलब्ध होत नसल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ होत आहे.
धाराशिव तालुक्यामध्ये काल झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे ज्वारी पीकाचे नुकसान झाले आहे. पावसाने मातीमोल झालेली ज्वारी आता शेतकऱ्यांना विक्री करता येणार नाही. त्यामुळे काढणीचा खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे.धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा गावामध्ये ज्वारीचे पीक पुर्णपणे मातीमोल झाल आहे.
गेले काही दिवस नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. काल सायंकाळी अनेक ठिकाणी आवकाळी पाऊस आणि गरपीट झाली. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याला बसला.अर्धापूर तालुक्यातील रोडगी , सोनाळा, चाभरा , खैरगाव , निमगाव या शिवारात गारांचा पाऊस झाला. गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसामुळे या भागात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले.गहू,आंबा, टरबुज,केळी, काढून ठेवलेली हळद यासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
बीड जिल्ह्यातील वडवणी आणि केज या दोन तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाऱ्यासह गारांचा दमदार पाऊस झाला. यामध्ये दोन्ही तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः हिवरखेड परिसरात पपईच्या बागा पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे पपईची झाडे मुळासकट पडली असून अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय मका, गहू आणि हरभरा या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक एका रात्रीत नष्ट झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. वारंवार येणाऱ्या अवकाळी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाने लवकरात लवकर मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
परभणी जिल्ह्यात काल रात्री विजांच्या कडकडासह वादळी वारा सुटला होता यात वाऱ्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले पाहायला मिळत आहेत. तर आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. अक्षरशः आंबा पूर्णपणे खाली पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आंब्याचे नुकसान झाले आहेत.
जालन्यात गारपिटीचा फटका डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसला आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव शिवारातील डाळिंब बागांमध्ये छोट्या छोट्या डाळिंबाच्या फळाचा सडा पडलेला पाहायला मिळतोय, तर झाडावर असलेल्या छोट्या डाळिंबाला देखील गारांचा मारा बसल्याने त्यांची देखील गळ होणार असल्याचा शेतकऱ्यांचे म्हणणं आहे. काल सायंकाळी झालेल्या गारांसह पावसामुळे जालन्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकारने डाळिंब उत्पादकांना तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.