विजय पाटील, सांगली प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी
शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन पक्ष विलीनीकरण करणार असल्याची बातमीने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. संजय राऊत, नाना पटोलेंपासून अनेक दिग्गज नेत्यांकडून समविचारी पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असे मत मांडले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावर सावध भूमिका घेण्यात आली होती. पण आता शरद पवार यांना थेट केंद्रीय मंत्र्यांकडून ऑफर देण्यात आली आहे. शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याऐवजी भाजपमध्ये यावे, अशी थेट ऑफ देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांना ही ऑफर दिली. ते सांगलीत पत्रकारांसोबत बोलत होते. "राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू नये, तर त्यांनी आमच्यासोबत यावे," असे जाहीर निमंत्रण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांना दिले आहे. आठवले यांच्या वक्तव्याने नव्या राजकीय समिकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, याआधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांना आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, "आता काँग्रेसमध्ये तो दम राहिला नाही आणि काँग्रेसला नजीकच्या काळात चांगले भविष्य दिसेल, अशीही परिस्थिती नाही," असा टोला त्यांनी लगावला. रामदास आठवले यांच्या प्रस्तावावर पवार गटाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. देशाच्या राजकारणात नवे समीकरण दिसणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
"शरद पवारांनी आमच्यासोबत यावे; जर त्यांना थेट भाजपमध्ये जायचे नसेल, तर त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये (RPI) यावे, आम्ही त्यांना भाजपसोबत घेऊन जाऊ," असे सूचक विधानही रामदास आठवले यांनी केले आहे. सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. रामदास आठवले यांच्या या वक्तव्याने सांगलीत राजकीय चर्चेला उधाण आलेय. पवारांकडून आठवलेंच्या प्रस्तावावर काय प्रतिक्रिया येते,याकडे सर्वांच्या नजरा खिळल्यात.
महागाई वाढली म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे ती दिसते. आम्ही लोकांना धान्य देतो, पण यात आम्हाला आनंद नाही. ही (लाभार्थ्यांची) संख्या कमी होणे गरजेचे आहे, अशी आमची भूमिका असे आठवले म्हणाले. पेपरफुटीच्या विषयावर ते म्हणाले, काँग्रेस पक्षाची आवश्यकता नाही, त्यासाठी भारतीय जनता पार्टी आहे. अमेरिकेत बसून हे चालत नाही. ठीक आहे, त्यांनी हा विषय हातात घेतला आहे; पण पेपरफुटीच्या माध्यमातून जे लोक दोषी सापडले आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. अमेरिकेतून येऊन मोर्चा काढण्यापेक्षा किंवा राजीनामा मागण्यापेक्षा त्यांनी सरकारला योग्य सूचना दिल्या तर बरे होईल, असे आठवले म्हणाले.
काँग्रेसचे 'मोदी हटाव' हे व्हिजन असेल; मात्र जोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे, तोपर्यंत मोदी काही हटणार नाहीत, असे ते म्हणाले. काँग्रेसने जे कर्ज करून ठेवले आहे, ते फेडण्याची वेळ आता आमच्यावर आली आहे. हे कर्ज फेडण्याची जबाबदारी आमची असून, ते फेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असेही आठवले म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.