राज्यात सध्या काही ठिकाणी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी ढगसदृश्य परिस्थिति निर्माण झाली असून पुर शेतीचे नुकसान आणि वाहतूक ठप्प होण्याच्या घटना समोर येत आहेत, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम आणि पुणे जिल्ह्यातील परिस्थिति गंभीर बनली आहे. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील पिंपळगाव ते आसेगाव देवी मार्गावर जोरदार पावसामुळे पुलावरून पाण्याच्या वेगाने प्रवाह सुरू झाला. पुलाची उंची कमी असल्याने पाणी थेट पुलावरून वाहू लागले आणि वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली.
या पुलाची उंची वाढवावी, यासाठी ग्रामपंचायतीने अनेकवेळा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मात्र दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांना दर पावसाळ्यात जीव धोक्यात घालून पुलावरून ये-जा करावी लागत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. येनगाव, वडगाव पाटण, तरोडा, सावरगाव, वडशिंगी या गावांमध्ये शेतांमध्ये पाणी शिरून पेरण्या वाहून गेल्या आहेत.
शेतरस्तेही पूर्णपणे वाहून गेले असून खरीप हंगाम धोक्यात आला आहे. तहसीलदार पवन पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांकडून तातडीच्या मदतीची मागणी केली जात आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कांचन नदीला पूर आल्यामुळे नेतंसा ते कोयाळी मार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला होता. विशेष म्हणजे या भागात पाऊस नसतानाही बुलढाण्यातील मुसळधार पावसामुळे हा पूर आला.
पूरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सुपीक माती वाहून गेली असून पेरण्या लांबण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांपासून वारंवार पूर येत असल्याने नदीचे खोलीकरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये चाकण येथे मुसळधार पावसानंतर साईड गटार तुंबल्याने पावसाचे पाणी थेट पुणे-नाशिक महामार्गावर आले. त्यामुळे महामार्ग जलमय झाला असून वाहनचालकांना पाण्यातूनच जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. मुसळधार पावसानंतर चाकणमधील साईड गटार बंद झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात पाणी पुणे-नाशिक महामार्गावर साचले आणि महामार्गाने अक्षरशः नदीचे स्वरूप धारण केले. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. चारचाकी, दुचाकी आणि मालवाहू वाहनांसह नागरिकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.