Latur Clash : शेतकऱ्यांच्या पोरांवर हल्ला,किंमत मोजावी लागेल; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर छावा संघटना आक्रमक
संदिप भोसले, साम टीव्ही
लातूर : सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ उडाला. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यावर हल्ला केला आहे. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान दिलं आहे. 'आज शेतकऱ्यांच्या पोरांवर हल्ला झाला असून याची किंमत मोजावी लागेल,अशा शब्दात विजय घाडगे यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.
अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेतच विजय घाडगे यांना मारहाण केली. त्यानंतर विजय घाडगे यांनी माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादीला मोठा इशारा दिला. विजय घाडगे म्हणाले, 'कृषिमंत्र्यांचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समोर आलाय. आम्ही राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाला सांगितलं की, आमच्याजवळील हे पत्ते घ्या, तुमच्या कृषिमंत्र्यांना द्या. त्यांनी विधीमंडळात पत्ते खेळले नाही पाहिजे. त्यांनी घरी पत्ते खेळले पाहिजे. त्यांना बडतर्फ करा. याबाबतचं निवेदन दिलं. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना माराहण केली. अतिशय अमानुष मारहाण केली आहे. शेतकऱ्यांच्या पोरांवर हा हल्ला केला आहे. राष्ट्रवादीची हीच वागणूक आहे का? माझा अजित पवारांना सवाल आहे की, तुम्ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या बाता मारता. त्यानंतर असे कृषिमंत्री देता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या पोरांना मारता. याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल'.
'लोकशाही मार्गाने आंदोलन केलं. पत्ते देऊन त्यांना घरी पाठवा, असे आमचं म्हणणं होतं. राज्याच्या विधानभवनात ते खेळत होते. तिथे अनेक कायदे होतात. राष्ट्रवादीच्या गुंडानी मारहाण केली. पोलिसांनी देखील संवेदनशीलपणे वागलं पाहिजे. पोलीस देखील शेतकऱ्यांची मुले आहेत. सहानभुतीने विषय हातळला पाहिजे. अजित पवारांना आव्हान आहे की, ही बाब तुम्हाला महागात पडणार आहे', असे घाडगे म्हणाले.
'आम्ही पत्ते उधळले नाहीत. आम्ही फक्त भेट दिली. राष्ट्रवादीच्या गुंडाना ही बाब पचली नाही. ही बाब चुकीच्या पद्धतीने घेतली. त्यानंतर हल्ला केला. छावा संघटनेवर हल्ला नसून शेतकऱ्याचा पोरावर हल्ला केला आहे. शेतकऱ्याच्या पोरावर हल्ला झाला आहे. त्याचं उत्तर आम्ही लवकर देऊ. सत्तेचा माज आलेले लोक आहेत. कृषिमंत्र्यांना बडतर्फ करण्याची मागणी होती. मात्र, त्यांनी चुकीच्या पद्धतीने मारहाण केली आहे. त्यांना सत्तेचा माज आला आहे, अशी टीका विजय घाडगे यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.