

एक लाखाच्या कर्जापायी किडनी विकावी लागलेला हाच तो चंद्रपूरच्या नागभीडमधील शेतकरी रोशन कुडे... आता तर तो थेट इच्छामरणाची परवानगी मागतोय...आणि त्याला कारण ठरलंय अजुनही गळ्याभोवती कायम असलेला सावकारी विळखा...त्यातून बाहेर पडण्यासाठी किडनी विकल्यानंतरही सावकारानं बळकावलेली जमीन परत काही मिळालीच नाही... त्यामुळे रोशन कुडेने सरकार दरबारी धाव घेतली.. मात्र तिथंही त्याच्या पदरी पडली अवहेलना..अनास्था.... आणि आश्वासनांचा पाऊस.....त्यामुळेच उद्विग्न झालेल्या रोशन कुडे या शेतकऱ्यानं आता थेट इच्छामरणाची परवानगी मागितलीय..
खरं तर रोशन कुडेनं खासगी सावकाराकडून शेतीसाठी 1 लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं..आणि त्याबदल्यात तब्बल 74 लाख रुपये परत केले... मात्र त्यानंतरही कर्ज काही फिटलं नाही... सावकारी तगादा सुरूच राहिला..अखेर त्यानं कंबोडियात जाऊन आपली किडनी विकली... आणि कर्ज भरलं... मात्र यानंतरही सावकाराने बळकावलेली जमीन काही परत केलीच नाही... हे प्रकरण साम टीव्हीनं चव्हाट्यावर आणल्यानंतर त्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीव्र पडसाद उमटले.. आणि मुख्यमंत्र्यांनी खासगी सावकारावर कारवाईचे आदेश दिले...
4 महिन्यांपासून रोशन कुडे न्यायासाठी सरकार दरबारी फेऱ्या मारतोय... मात्र पाषाण हृदयी प्रशासनाला काही पाझर फुटत नाही... आधी किडनी गेली.... त्यानंतर शेतीही गेली.. मग आता उपजिविकेचं साधनच नसल्यानं जगायचं तरी कशासाठी म्हणत रोशन हतबल झालाय..त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट इच्छामरणाची परवानगी मागितलीय... मात्र प्रश्न उरतोय तो हा की, मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही त्यावर कारवाई का नाही..
4 महिन्यांपासून न्यायासाठी रांगेत असलेल्या रोशनला न्याय मिळणार की नाही? खरंच प्रशासनातील संवेदनशीलता हरवली आहे का? याबरोबरच प्रशासन आता तरी परिस्थितीने हतबल झालेल्या शेतकऱ्याला त्याची शेती परत करुन न्याय देणार आहे का? यावरुनच सरकारला शेतकऱ्यांची खरच कदर आहे का हे स्पष्ट होईल...