

राज्यात मनपा निवडणुकीने राजकीय वातावरण तापलेलं असतानाच भाजपच्या केंद्रीय मंत्र्याच्या वादग्रस्त वक्तव्याने आगीत तेल ओतलं गेलंय. छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते, हिंदू राष्ट्र स्थापनेचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला, असं म्हणत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. सुरतमध्ये आयोजित पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलंय.
दरम्यान पाटलांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाराजांना जात लावु नका, असा हल्लाबोल ठाकरे सेनेने केलाय. तर शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते मर्यादीत ठेवण्याचा प्रयत्न राऊत करत असल्याचं प्रत्युत्तर भाजपनं दिलंय. अजित पवार यांनीदेखील सी. आर. पाटील यांच्या विधानावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.
“छत्रपती शिवाजी महाराज व त्यांची वंशावळ सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बोलत असतो. पाटील यांचं भाषण मी काही ऐकलेलं नाही. पण महाराजांचा वंश, भोसले घराणं, सातारची गादी हे सगळ्यांना माहिती आहे”, असं ते म्हणाले.
पोलीस शिपाई ते केंद्रीय कॅबिनेट मंत्री असा चंद्रकांत रघुनाथ पाटील ऊर्फ सी. आर. पाटील यांचा राजकीय प्रवास आहे. गुजरात भाजपचे ते वजनदार नेते आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी अकराऊत हे त्यांचं मूळ गाव आहे. यापूर्वी भाजपचे ओडीशामधील खासदार प्रदीप पुरोहित यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते" असे विधान केले होते. पुरोहीत यांनी थेट संसदेत केलेल्या या वक्तव्याने गदारोळ झाला होता. आता सी. आर. पाटील यांनी पुन्हा अकलेचे तारे तोडले आहेत. महापुरूषांना जाती-पातीत ओढून नको तो वाद निर्माण करणं मंत्रिपदावरील जबाबदार व्यक्तींना शोभत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.