

चामटोली ग्रामपंचायत कार्यालयात सुट्टीच्या दिवशी संशयास्पद हालचाल.
‘ऑडिट’च्या नावाखाली कागदपत्रे हाताळणाऱ्या दोन जणांना गावकऱ्यांनी पकडले.
महत्त्वाची कागदपत्रे चोरण्याचा डाव असल्याचा आरोप.
गावकरी होळीचा सण साजरा करत असताना बदलापूर जवळच्या चामटोली ग्रामपंचायत कार्यालयात अजब कारभार घडलाय. याठिकाणी सुट्टीच्या दिवशी ऑडिटच्या नावाखाली ग्रामपंचायतीची कागदपत्रं हाताळणाऱ्या दोन भामट्यांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडलंय. कुणाच्या तरी सांगण्यावरून महत्वाची कागदपत्रं चोरण्यासाठीच हा प्लॅन होता असा आरोपही इथले सामाजिक कार्यकर्ते आणि या प्रकरणातील तक्रारदार धनाजी इरमाळी यांनी केलाय.
या दोन संशयास्पद व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात देत त्यांनी याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारही केलीय. मंगळवारी होळीनिमित्त शासकीय सुटटी होती. असं असताना 2 संशयास्पद व्यक्ती ऑडिटच्या कामानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाल्या. त्यांच्याकडे कोणतेही लेखी आदेश नव्हते. त्यांनी कार्यालयातील सर्व दस्तावेजांची बांधाबांध केल्याची कुणकुण लागताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते धनाजी इरमाळी, ग्रामपंचायत सदस्य सुकऱ्या हंबीर तसच इतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन त्यांना याचा जाब विचारला. तसच पोलिसांना बोलवून त्यांची चौकशी केली.
तेव्हा ऑडिटच्या नावाखाली ग्रामपंचायतीची कागदपत्रं हाताळणाऱ्या भामट्यांना एकाही प्रश्नाचं नीट उत्तर देता आलं नाही. ग्रामसेवक कैलास हेगडे यांच्या सांगण्यावरून आपण याठिकाणी आल्याचं त्यांनी सांगितलं. या व्यक्तींकडे कोणतंही शासकीय ओळखपत्रं देखील नव्हतं. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत त्यांच्या बोलण्यातही विसंगती दिसून आली. गंभीर बाब म्हणजे तक्रारदार धनाजी इरमाळी यांनी माहिती अधिकारात ग्रामपंचायतीकडून काही कागदपत्रांची माहिती मागितली होती. तसच ग्रामपंचायतीशी संबंधित काही प्रकरणं सुप्रीम कोर्टात दाखल आहेत.
त्यामुळे महत्वाची कागदपत्रं गहाळ करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानंच या व्यक्ती तिथे आल्या होत्या का? असा सवालही धनाजी इरमाळी यांनी उपस्थित केलाय. या प्रकरणी इरमाळी आणि चामटोलीतल्या ग्रामस्थांनी बदलापूर ग्रामीण पोलिसांत तक्रारही दाखल केलीय. तसच अंबरनाथच्या गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनाही निवेदन देत ग्रामसेवक कैलास हेगडेंसह दोषींवर कडक कारवाईची मागणी केलीय. चामटोली ग्रामपंचायतीतील या संशयास्पद हालचालींप्रकरणी अनेक सवाल उपस्थित होतायेत.
मुळात ऑडिटच्या नावाखाली ग्रामपंचायतीचे दस्तऐवज हातळणाऱ्या या व्यक्ती कोण आहेत? कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी कागदपत्रांची हाताळणी केली? यावेळी ग्रामसेवक तसच जबाबदार शासकीय अधिकारी उपस्थित का नव्हते? की तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे महत्वाची कागदपत्रं गायब करण्याचा हा प्लॅन होता का? याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.