
हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत आहे
उच्च रक्तदाब सर्वात मोठं कारण
99% रुग्णांमध्ये जोखीम घटक होते
गेल्या काही वर्षांत हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचं प्रमाण झपाट्याने वाढताना दिसतंय. यासंदर्भात नुकतंच एक महत्त्वाचे संशोधन समोर आलंय. यामध्ये असं आढळून आलंय की, ज्यांना हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा त्रास झाला त्यांनी त्यांच्या आयुष्यात काही गंभीर आरोग्यसंबंधी चुका केल्या होत्या. या चुकांमुळेच त्यांना हृदयविकार किंवा स्ट्रोकचा धोका निर्माण झाला.
तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं की, अशा लोकांपैकी बहुतेकांना हृदयविकाराच्या चार प्रमुख कारणांपैकी किमान एक समस्या आधीपासून होती. मात्र त्यांनी ती वेळेवर ओळखून उपचार केले नाहीत.
अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात सहभागी झालेल्या 99 टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाब (हाय बीपी), जास्त कोलेस्ट्रॉल, अनियमित रक्तातील साखर आणि तंबाखूचे सेवन यांसारख्या समस्या आढळल्या होत्या. यामधील सर्वात सामान्य समस्या म्हणजे उच्च रक्तदाब होती. अभ्यासात नमूद केल्याप्रमाणे, या सर्व समस्या योग्य वेळी ओळखून त्यावर नियंत्रण ठेवले असते, तर हृदयविकाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकलं असतं.
हा अभ्यास दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील एकत्रितपणे सुमारे 20 वर्षांहून अधिक काळ करण्यात आला. यामध्ये दक्षिण कोरियातील सुमारे 6 लाख रुग्ण आणि अमेरिकेतील 1000 तरुणांचा समावेश होता. सहभागींपैकी बहुतांश लोकांना रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखरेचं असंतुलन किंवा धूम्रपानाची सवय होती. दक्षिण कोरियातील 95 टक्के आणि अमेरिकेतील 93 टक्के लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असल्याचे दिसून आले.
या संशोधनाचे वरिष्ठ लेखक आणि नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी फिनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनचे प्रिव्हेन्टिव्ह मेडिसिनचे प्राध्यापक फिलिप ग्रीनलँड यांनी सांगितलं की, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उच्च रक्तदाब ओळखणं सोपं आहे. मात्र ही समस्या सुरुवातीला कोणतंही स्पष्ट लक्षण दाखवत नाही, त्यामुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. आमच्या संपूर्ण अभ्यासाचा केंद्रबिंदू म्हणजे या समस्या वेळेत ओळखून त्यावर नियंत्रण ठेवणं.
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, जर रक्तदाब 120/80 च्या आसपास असेल, तर त्यावर तातडीने उपचार करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण 200 mg/dL किंवा त्याहून अधिक असल्यास तेही धोकादायक मानण्यात येते.
ग्रीनलँड यांनी पुढे सांगितलं की, हृदयविकाराच्या काही कारणांवर नियंत्रण ठेवणं शक्य नसतं. जसं की आनुवंशिक घटक किंवा काही विशिष्ट ब्लड मार्कर्स. मात्र बहुतेक डॉक्टर नियमित तपासणी करून रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला देतात. वय, जीवनशैली आणि आरोग्यस्थिती यानुसार वेळोवेळी तपासणी करणे हे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकपासून बचावासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
या संशोधनातून स्पष्ट होतं की, हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करायचा असेल, तर जीवनशैलीत योग्य बदल करून रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवणं हच सर्वात प्रभावी मार्ग आहे.
हार्ट अटॅकचं मुख्य कारण काय?
उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि साखरेचे असंतुलन.
रक्तदाब किती असला की धोका असतो?
120/80 पेक्षा जास्त असल्यास धोका असतो.
कोलेस्ट्रॉलची सीमा किती आहे?
200 mg/dL पेक्षा अधिक धोकादायक आहे.
हृदयविकार टाळण्यासाठी काय करावे?
नियमित तपासणी आणि जीवनशैलीत सुधारणा करावी.
संशोधनात किती रुग्णांचा समावेश होता?
दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील लाखो रुग्ण.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.