
मधुमेह, लठ्ठपणा आणि यांसारखे असंसर्गजन्य आजार (NCDs) आजच्या काळात झपाट्याने वाढत आहेत. हे असे आजार आहेत जे संसर्गजन्य रोगांसारखे पटकन पसरत नाहीत आणि ना लस किंवा साध्या औषधांनी सहज बरे होतात. हे विकार हळूहळू वाढत जातात आणि वेळेत लक्ष दिलं नाही तर हृदय, किडनी, डोळे आणि संपूर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम करतात.
भारत या आरोग्यसंकटाचं केंद्रबिंदू बनत चाललाय. “जगाची मधुमेह राजधानी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या देशात सर्व वयोगटांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. चिंताजनक बाब म्हणजे हे आजार आता फक्त वृद्धांमध्येच नव्हे तर तरुण व्यावसायिक, किशोरवयीन आणि लहान मुलांमध्येही दिसू लागलेत. जीवनशैलीतील बदलांमुळे या आजारांचं वय कमी होत चाललं आहे.
हे वास्तव पंतप्रधानांनी 2025 च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात अधोरेखित केलं होतं. त्यांनी शहरी भागांतील वाढत्या लठ्ठपणाला “निःशब्द महामारी” असं संबोधून इशारा दिला की, कुटुंब आणि समाजाने आताच पावलं उचलली नाहीत, तर भारताला लवकरच गंभीर आरोग्य समस्यांचा मोठा ताण सहन करावा लागेल.
नवी मुंबईतील व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे डॉ. विजय डी’सिल्वा सांगतात, “या वाढीला अनेक जीवनशैलीतील सवयी जबाबदार आहेत. दिवसभर बसून काम करणे, लांबचा प्रवास, झोपेचं असमतोल वेळापत्रक, फास्ट फूडचं सेवन आणि सततचा ताण हे सगळे घटक मेटाबॉलिक विकारांना आमंत्रण देतात. अनुवंशिकता काही प्रमाणात कारणीभूत असली, तरी जीवनशैलीचे निर्णयच ठरवतात की, जोखीम प्रत्यक्ष आजारात रूपांतरित होईल की नाही.”
सकारात्मक बाब म्हणजे, मधुमेह आणि लठ्ठपणा या दोन्ही समस्या योग्य वेळी टाळता आणि नियंत्रणात ठेवता येऊ शकतात. नियमित आरोग्य तपासण्या केल्यास आजार सुरुवातीच्या टप्प्यात सापडतात आणि गुंतागुंत टाळता येते. संतुलित आहार घेणं, दररोज शारीरिक हालचाल करणं, ताण कमी ठेवणं हे जीवनशैलीतील बदल आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
फक्त उपचार देणं पुरेसं नाही, तर प्रतिबंधावर भर देणं आणि जनतेला जागरूक करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. याच उद्देशाने व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटलने नवी मुंबईत मोफत डायबेटीस आणि लठ्ठपणा तपासणी शिबिर आयोजित केलं. या शिबिरात २५० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.
आगामी काळासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. कुटुंबांनी घरी निरोगी दिनचर्या स्वीकारावी, संस्था आरोग्यपूरक कामाचं वातावरण निर्माण करावं आणि धोरणकर्त्यांनी सार्वजनिक आरोग्य नियोजनामध्ये NCD प्रतिबंधाला प्राधान्य द्यावं. भारताचा मधुमेह आणि लठ्ठपणाविरुद्धचा लढा केवळ औषधोपचारांनी जिंकला जाणार नाही. खरी उपाययोजना म्हणजे आपल्या जीवनशैलीचा बदलणं, प्रतिबंधाला स्वीकारणं आणि आजच सक्रिय पावलं उचलणं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.