

पश्चिम बंगालमधील बारुईपूरमध्ये ११-१२ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केलीये. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'एन्काउंटर पॅटर्न'प्रमाणेच या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रबाश मंडल याचा पोलिसांनी एन्काउंटरमध्ये खात्मा केलाय. बुधवार पहाटे झालेल्या या चकमकीत त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री पाऊणच्या सुमारास बारुईपूर पोलीस ठाण्याचे पथक मुख्य आरोपी प्रबाश मंडल याला गुन्ह्याची जागा दाखवण्यासाठी आणि घटनाक्रम समजून घेण्यासाठी सूर्यपूर भागात घेऊन गेले होते. मात्र ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच प्रबाशने एका पोलिसाची सर्व्हिस गन हिसकावून घेतली. त्याने पोलिसांवर एक राउंड गोळीबार केला आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी स्वतःच्या रक्षणासाठी तात्काळ गोळीबार केला. ज्यात प्रबाश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने बारुईपूर रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील बारुईपूरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण देश हादरला. ४ जुलैच्या संध्याकाळी १२ वर्षांची मुलगी आपल्या मित्राच्या वाढदिवसाचं गिफ्ट खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती, पण ती परत आलीच नाही. कुटुंबीयांनी त्याच रात्री पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शोध सुरू केला असता दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ जुलैच्या सकाळी सूर्यपूर हाटजवळील एका तलावात पोत्यात भरलेला त्या मुलीचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या. तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार करून तिला जखमी केले गेले आणि ती जिवंत असतानाच पोत्यात बंद करून तलावात फेकून दिलं. पाण्यात बुडाल्यामुळेच तिचा मृत्यू झाला.
या क्रूरतेमुळे स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात सामूहिक बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करणं आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून आनंद सरदार, प्रबास मंडल आणि दिबाकर सरदार अशा ३ जणांना अटक केली होती.
मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर लोकांचा राग अनावर झाला होता. संतापलेल्या जमावाने इंद्रनाथ तांती नावाच्या एका तरुणाला संशयावरून बेदम मारहाण केली. ज्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र, ७ जुलै रोजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, जमावाच्या रागाचा बळी ठरलेला इंद्रनाथ तांती हा तरुण पूर्णपणे निर्दोष होता, त्याचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नव्हता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.