दिल्ली-एनसीआर, मुंबई, नवी मुंबई आणि हैदराबाद, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानपर्यंत पसरलेल्या कॅन्सरच्या बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा दिल्लीच्या क्राइम ब्रांचने पर्दाफाश केला आहे. कॅन्सरची बोगस औषधं पुरवणारी ही आंतरराज्यीय टोळी उद्ध्वस्त करण्यात क्राइम ब्रांचला यश आलं आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरील महागड्या औषधांची अवैध पद्धतीने खरेदी, साठा करणे, रिपॅकेजिंग करण्याचं काम ही टोळी करायची. या प्रकरणी आतापर्यंत १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
दिल्ली क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी एकाचवेळी दिल्ली आणि नवी मुंबईत धडक कारवाई केली. कॅन्सरच्या बनावट औषधांचा मोठा साठा जप्तही केला. या प्रकरणात १७ आरोपींना अटक केली. रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स आणि अवैध सप्लाय चेनमध्ये ते सामील असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी या छापेमारीत एकूण ९ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात औषधांनी भरलेल्या ५८८ बाटल्या, तर ६ रिकाम्या बाटल्या, औषधे ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रिकाम्या ७ डब्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ३ हजार २१ यूनिट इतर औषधे जप्त करण्यात आली आहेत. या रॅकेटमधील १७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
दिल्लीच्या गुन्हे शाखेने ११ जुलै रोजी सात पथके तयार केली. दिल्ली आणि नवी मुंबईत एकाच वेळी छापा टाकला. या छाप्यात ९ कोटींची औषधे, तसेच ५० लाख रोकडही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे हे बनावट औषधांचा पुरवठा करणारं नेटवर्क किती दूरपर्यंत पोहोचलं आहे याची माहिती समोर आली आहे. दिल्ली - एनसीआर, मुंबई , हैदराबाद, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये हे जाळे पसरले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे नेटवर्क अवैध स्त्रोतांकडून बनावट औषधे मिळवायचे. रुग्णालयांतील औषधांमध्ये फेरफार करून ते चोरी करायचे. अनेक सरकारी संस्था आणि गोदामांमधील औषधांमध्ये फेरफार करायचे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील काही आरोपी हे रुग्णालयांतील कर्मचारी होते, अशी माहिती तपासात उघड झाली. तसेच काही आरोपी हे मेडिकल स्टोरमधील कर्मचारी होते. ही औषधे विकण्यासाठी जुन्या पुठ्ठ्यांच्या खोक्यांमध्ये किंवा दुसऱ्या औषधांच्या बॉक्समध्ये बबल रॅप, पॉलिथिनमध्ये पॅकिंग केले जायचे. बॅच क्रमांक, एमआरपी आणि ओळखचिन्हे पुसली जायची.
हे नेटवर्क देशभरातील इतर राज्यांतही पसरले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात झालेला पैशांचा व्यवहार आणि संबंधित नेटवर्कचा तपास केला जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीत जसजशी माहिती समोर येईल, तसा कारवाईचा वेग वाढेल आणि आणखी काही जणांना अटक होऊ शकते, असे सांगितले जात आहे.