

देशातल्या कोट्यवधी रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. 'वन नेशन, वन रेशन कार्ड' (ONORC) योजनेअंतर्गत आता रेशन वितरण व्यवस्थेत महत्वाचा बदल केला आहे. या नव्या व्यवस्थेमुळे लाभार्थ्यांना संपूर्ण धान्य एकाच रेशन दुकानातून घेण्याची सक्ती राहणार नाही. आता नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार देशातल्या कोणत्याही रेशन दुकानातून वेगवेगळे धान्य घेण्याची सुट मिळणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री बी.एल. वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशन कार्डधाकर आता एका दुकानातून गहू तर दुसऱ्या दुकानातून तांदूळ घेऊ शकणार आहेत. त्यामुळे रेशन मिळवण्यासाठी एका विशिष्ट दुकानावर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही. सरकारने ही व्यवस्था बँकेतल्या एटीएमसारखी लवचिक बनवली आहे.
ज्या पद्धतीने ग्राहक कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकतात. त्याचप्रमाणे आता रेशनधारक देशाच्या कोणत्याही भागात असलेल्या सरकारी रेशन दुकानातून आपल्या वाट्याचे धान्य घेऊ शकतील.
सरकारच्या या निर्णयाचा सर्वात जास्त फायदा स्थलांतरित मजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना होणार आहे. रोजगारासाठी दुसऱ्या शहरात किंवा राज्यात राहणाऱ्या नागरिकांना आता मूळ गावातल्या रेशन दुकानावर अवलंबून राहावं लागणार नाही. ते ज्या ठिकाणी राहतात, तिथल्या जवळच्या रेशन दुकानात आधार कार्ड आणि बायोमेट्रिक पडताळणीच्या मदतीने धान्य घेऊ शकतील.
दरम्यान संपूर्ण सार्वजनिक वितरण प्रणाली जास्त पारदर्शक आणि सक्षम करण्यासाठी सरकार तांत्रिक सुधारणा करत आहे. देशभरातल्या रेशन दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजनकाटे थेट ई-पॉस मशीनशी जोडले जात आहेत. त्यामुळे धान्य वाटपातला गैरप्रकार आणि घटतौलीला आळा बसणार आहे. तसेच 'मेरा रेशन 2.0' या मोबाईल अॅपच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्यांच्या शिल्लक कोट्याची माहिती, जवळचे रेशन दुकान आणि आधार लिंकिंगची माहिती सहज तपासता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.