सूर्यकुमार यादव अनफिट राहिल्यास शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी
यशस्वी जयस्वाल व साई सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता कमी
जसप्रीत बुमराह फिट, पण रोटेशन पॉलिसीमुळे विश्रांती मिळू शकते
भारतीय संघाची घोषणा १९-२० ऑगस्टला अपेक्षित
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत नेतृत्वगुणांची चुणूक दाखवणारा भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल याला मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. आशिया कप २०२५ मध्ये तो नेतृत्व करताना दिसू शकतो. दुसरीकडं इंग्लंडमध्येच कसोटी मालिकेत दमदार फलंदाजी करून इंग्लंड गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या यशस्वी जयस्वालला या स्पर्धेतून डच्चू दिला जाऊ शकतो. बीसीसीआयकडून लवकरच आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. त्याचवेळी नियमित कर्णधार सूर्यकुमार यादवबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ ही स्पर्धा सुरू होणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा १९ किंवा २० ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. सेंटर ऑफ एक्सिलेन्सची स्पोर्ट्स सायन्स टीम देखील सर्व खेळाडूंचे मेडिकल रिपोर्ट लवकरच बीसीसीआयकडे देणार आहे. त्यानंतर अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समिती संघाची घोषणा करणार आहे.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, सर्वांच्या नजरा या टी २० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या फिटनेसवर आहेत. हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर आता तो बेंगळुरूस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत आहे. जर तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला नाही तर, त्याची जागा शुभमन गिल घेऊ शकतो. गिलकडे टी २० संघाचं कर्णधारपद सोपवण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सूर्यकुमारच्या नेतृत्वात चांगली कामगिरी करणारे प्रमुख खेळाडू बदलण्याची निवड समितीची कोणतीही योजना नाही. त्यात अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, अभिषेक शर्मा हा टी २० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. संजू सॅमसन यानं मागील मोसमात चांगली फलंदाजी आणि विकेटकीपिंग केली होती. शुभमन गिल यानं आयपीएल आणि इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी केलीय. तरीही टॉप ऑर्डरमध्ये त्याला जागा मिळणं कठीण आहे. जर सूर्यकुमार अनफिट राहिला तरच शुभमन गिलला संधी मिळू शकते.
आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा साई सुदर्शन आणि इंग्लंड दौऱ्यात शतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जयस्वालला संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे. केएल राहुलला देखील या संघात स्थान मिळणं कठीण आहे. आशिया कपमध्ये भारतीय संघ १० सप्टेंबरपासून सुरुवात करणार आहे. १४ सप्टेंबरला पाकिस्तानसोबत लढत असणार आहे.
तेजतर्रार गोलंदाज जसप्रीत बुमराह आशिया कपमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. मात्र, टीम इंडियाचं व्यग्र वेळापत्रक बघता त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. भारताला ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच वेस्टइंडीजविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. अशावेळी अर्शदीप सिंगला पर्याय म्हणून संधी दिली जाऊ शकते. तिसरा गोलंदाज म्हणून प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांच्यापैकी एकाची निवड केली जाऊ शकते. आशिया कपमध्ये संजू सॅमसन हा प्रमुख विकेटकीपर असेल. तर निवड समिती पर्याय म्हणून जितेश शर्मा आणि ध्रुव जुरेल यांच्यापेकी एकाला संघात घेऊ शकते. दुखापतीमुळं नितीश कुमार रेड्डी आशिया कपमध्ये खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्याच्या अनुपस्थितीत शिवम दुबेला संधी मिळू शकते.
सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा किंवा प्रसिद्ध कृष्णा, जितेश शर्मा किंवा ध्रुव जुरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.