भारताचे महान क्रिकेटपटू कोण? असा प्रश्न कोणी विचारला तर, क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणारा, आवडत्या खेळाडूंचे रेकॉर्ड कॉम्प्युटरसारखा डोक्यात फिट्ट करणारा अस्सल चाहता अगदी कपिल देवपासून आताच्या विराट कोहली, रोहित शर्मापर्यंत अशी लांबलचक यादी झरझर वाचून दाखवतील. पण अव्वल पाच महान क्रिकेटपटूंबद्दल कोणी विचारलं तर थोडा विचार करावा लागेल.
कारण ही यादीच मोठी आहे. त्यात निवड करायची तर कुणाची असा प्रश्न सगळ्यांनाच पडेल. रवी शास्त्रींनी याचं उत्तर दिलंय. पण ही यादी बघून टी २० वर्ल्डकप विजेता रोहित शर्माचे चाहते काहीसे नाराज झाल्याचे दिसते. शास्त्रींनी पाच महान क्रिकेटपटूंची नावं सांगताना अगदी विराट कोहलीला त्या यादीत स्थान दिलंय. पण रोहित शर्माचं नावही घेतलं नाही. त्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि प्रसिद्ध क्रिकेट समालोचक रवी शास्त्री यांनी आपले आवडते टॉप ५ महान भारतीय क्रिकेटपटूंची नावं सांगितली. त्यापैकी तिघांसोबत तर ते क्रिकेट खेळले आहेत. तर दोघांचे ते प्रशिक्षक होते. या यादीत पहिलं नाव अर्थातच महान फलंदाज सचिन तेंडुलकरचं होतं. तसेच या लिस्टमध्ये कपिल देव यांच्यासह दोन वर्ल्डकप विजेते क्रिकेटपटू आहेत.
रवी शास्त्री हे १९८१ ते १९९२ या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. आपल्या कारकीर्दीत त्यांनी ८० कसोटी आणि १५० एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात अनुक्रमे ३८३० आणि ३१०८ धावा केल्या. त्यांनी कसोटीत १५१ आणि एकदिवसीय सामन्यात १२९ विकेट्स घेतल्या. शास्त्री यांनी 'द ओव्हरलॅप क्रिकेट' पॉडकास्टमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन आणि एलेस्टेयर कुक याच्यासोबत चर्चा केली. यात शास्त्रींनी टॉप फाइव्ह भारताचे महान आणि प्रभावशाली क्रिकेटपटूंची नावं सांगितली.
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, कपिल देव, विराट कोहली आणि एमएस धोनी यांची नावे त्यांनी घेतली. शास्त्रींच्या म्हणण्यानुसार, या पाच खेळाडूंनी वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगळ्यावेगळ्या पिढ्यांवर प्रभाव टाकून भारतीय क्रिकेटचा चेहराचेहरा बदलून टाकला. शास्त्रींनी सचिन तेंडुलकरचं नाव पहिल्यांदा घेतलं. तेंडुलकरनं २० वर्षांहून अधिक वर्षे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षांचा भार सांभाळला. १०० शतकं करणारा एकमेव खेळाडू आहे. त्यानं सर्वाधिक ३४३५७ धावा केल्या. दुसरीकडे, लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी भारतीय क्रिकेटमध्ये विश्वास भरलाय. १० हजार धावा करणारे जगातील पहिले क्रिकेटपटू होते. कपिल देव यांनी कर्णधार म्हणून भारताला १९८३ चा वर्ल्डकप जिंकून दिला. त्यांना भारताचे सर्वात महान ऑलराउंडर म्हणून ओळखले जाते
शास्त्रींच्या टॉप ५ यादीत चौथं नाव विराट कोहलीचं आहे. कोहलीने संघाचं नेतृत्व करताना सर्वाधिक कसोटी सामने जिंकून दिले आहेत. त्याने ६७ कसोटी सामन्यांत नेतृत्व करताना ४० सामन्यांत विजय मिळवला आहे. त्याने २०२५ मध्ये कसोटी क्रिकेटला रामराम केला आहे. तर, माजी कर्णधार एमएस धोनी यानं भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. त्याच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये टी २० वर्ल्डकप, २०११ मध्ये वनडे वर्ल्डकप आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्या. मात्र, या यादीत टी २० वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या रोहित शर्मा याचं नाव नाही. त्यामुळे रोहितचे चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.