भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्नच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यााचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने शानदार शतकी खेळी केली.
या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ४७४ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारखे फलंदाज फ्लॉप ठरले. त्याच खेळपट्टीवर फलंदाजी करताना, नितीश कुमार रेड्डीने शानदार शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
नितीश कुमार रेड्डी मेलबर्नच्या मैदानावर आपल्या कसोटी कारकिर्दीतील चौथा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. यापूर्वी त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत त्याने अर्धशतकही झळकावलं नव्हतं. या सामन्यात भारतीय संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची गरज होती.
आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने आपलं शतक पूर्ण केलं. यापूर्वी ऑस्ट्रेलियात खेळताना कुठल्याही भारतीय फलंदाजाला हा कारनामा करता आला नव्हता. या खेळीच्या बळावर त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
बॉर्डर- गावसकर मालिकेतील पहिल्या कसोटीत त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याने आतापर्यंत ४ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २८४ धावा केल्या आहेत. यासह त्याला टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी ३ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ९० धावा केल्या आहेत.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करुन त्याने राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं आहे. त्याला आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २६ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ९५८ धावा केल्या आहेत. यासह आयपीएल स्पर्धेत तो सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना दिसून आला होता. या संघाकडून खेळतानाही त्याने धावांचा पाऊस पाडला होता. आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याने एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार पटकावला होता.
या सामन्यात भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला होता. मात्र त्यानंतर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी मिळून संघाचा डाव सांभाळला. केएल राहुल बाद झाल्यानंतर, विराट आणि जयस्वालने शतकी भागीदारी केली.
भारताकडून फलंदाजी करताना, नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक १०५ धावांची खेळी केली. तर यशस्वी जयस्वालने ८२, वॉशिंग्टन सुंदरने ५०, विराट कोहलीने ३६ आणि केएल राहुलने २४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ९ गडी बाद ३५८ धावांपर्यंत मजल मारली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.