आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात केले जाणार आहे. तब्बल २८ वर्षांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर पाकिस्तानला पहिल्यांदाच कुठल्याही आयसीसी स्पर्धेचे यदमानपद भुषवण्याची संधी देण्यात आली आहे. यापूर्वी १९९६ वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात करण्यात आले होते. ही स्पर्धा भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेत संयुक्तरित्या भरवण्यात आली होती. त्यानंतर भारत आणि श्रीलंकेला आयसीसीच्या अनेक स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळाली. मात्र पाकिस्तानात पहिल्यांदाच आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. दरम्यान बीसीसीआयने या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याचे म्हटले जात आहे.
यापूर्वी आशिया चषक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात केले गेले होते. त्यावेळी भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत खेळवले गेले होते. यावेळीही भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे. याबाबत बोलताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राशिद लतीफ म्हणाला की, ' चॅम्पियन्स ट्रॉफीवर बहिष्कार टाकणं मुळीच सोपं नसेल. तुम्ही द्विपक्षीय मालिका खेळण्याचा प्रस्ताव धुडकावून लावू शकता. मात्र आयसीसीच्या स्पर्धांमध्ये असं करणं कठीण आहे. आयसीसीने एकदा आराखडा तयार केला की, तुम्हाला माहित असतं तुम्हाला कुठे खेळायचं आहे. बाबर आझमलाही वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात जावं लागलं होतं.'
तसेच तो पुढे म्हणाला की, ' आयसीसीच्या स्पर्धांसाठी सर्व संघ संमतीनंतर स्वाक्षरी करतात. मग तुम्ही नकार कसा देऊ शकता? दोन्ही देशांच्या सरकारी स्तरावर काही असतं तर तुम्ही अशी उत्तरं देऊ शकले असता. पण सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तानात खेळण्यासाठी येणार नसाल. तर माझ्या मते भारतीय संघाने पाकिस्तानात येण्याचा प्रस्ताव फेटाळला तर याचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.