आयर्लंडविरुद्धची टी-20 सिरीज गमावल्यानंतर आता टीम इंडियावर इंग्लंडविरुद्धची सिरीजही हातातून जाण्याचं संकट ओढवलंय. पाच सामन्यांच्या टी-20 सिरीजमध्ये भारत सध्या ०-२ असा पिछाडीवर आहे. त्यामुळे गुरुवारी म्हणजेच आज ब्रिस्टलमधील काउंटी ग्राउंडवर होणारा चौथा सामना टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा ठरणार आहे. या सामन्यात पराभव झाल्यास भारत सिरीज गमावणार आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये कोणते बदल होणार आहेत ते पाहूयात.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतरचा दुसरा आणि तिसरा सामना इंग्लंडने जिंकत सिरीजमध्ये २-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे आता सिरीज वाचवायची असल्यास टीम इंडियाला चौथा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला अद्याप या सिरीजमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. पहिल्या सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळाली होती मात्र त्याची कामगिरी निराशाजनक ठरली. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं. मात्र वैभवही सलग दोन सामन्यांत अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे चौथ्या सामन्यात संजू सॅमसनला पुन्हा संधी मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय टॉसनंतरच स्पष्ट होईल.
चौथ्या टी-20 सामन्यात टीममध्ये आणखी एक बदल होण्याची शक्यता आहे. मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या जागी अष्टपैलू सूर्यांश शेडगेला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजीलाही त्याचा फायदा होणार आहे. मात्र त्यानंतर शिवम दुबे आणि सूर्यांश शेडगे यांच्यावर मिळून चार ओव्हर्सची जबाबदारी असणार आहे.
दुसरा पर्याय म्हणून वरुण चक्रवर्तीऐवजी फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरलाही प्लेईग ११ मध्ये स्थान मिळू शकतं. सुंदर गोलंदाजीसोबतच उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. याशिवाय टीममध्ये इतर कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र सामन्यापूर्वी एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास परिस्थिती बदलू शकते.
अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी/संजू सॅमसन, ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, सूर्यांश शेडगे/वॉशिंग्टन सुंदर/वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, प्रिन्स यादव आणि अर्शदीप सिंह.