रोहित शर्मानंतर आता चाहत्यांना बसणार आणखी एक मोठा धक्का
सूर्यकुमार यादवबाबत माजी खेळाडूची भविष्यवाणी
शुभमन गिलकडे टी २० संघाचं नेतृत्व सोपवणार?
भारताच्या विजयाचा स्ट्राइक रेट ७० टक्क्यांपेक्षा जास्त ठेवणाऱ्या रोहित शर्माचं कर्णधारपद गेल्यानंतर आता टी २० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वावरही टांगती तलवार आहे. रोहित शर्मानंतर भारताच्या एकदिवसीय संघाची धुरा शुभमन गिलकडं सोपवली आहे. यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटू आपापली मते व्यक्त करत आहेत. रोहित शर्माच बेस्ट होता, असं म्हणणारेही बरेच आहेत. ही चर्चा सुरू असतानाच, इंग्लंडच्या माजी फिरकीपटूनं सूर्यकुमारच्या कर्णधारपदाबाबत टाकलेल्या गुगलीनं क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.
शुभमन गिलला एकदिवसीय संघाचा कर्णधार करण्याचा निर्णय हा मास्टरस्ट्रोक असल्याचं इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पनेसरनं म्हटलं आहे. गिल हा नॅचरल लीडर आहे. जबाबदारी मिळाल्यानंतर तो सर्वोकृष्ट खेळ करतो, असंही पनेसर म्हणाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयनं शुभमन गिलकडं नेतृत्व दिलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली संघात आहेत. पण त्यांच्याकडं कुठलीही जबाबदारी नाही. त्यामुळं क्रिकेट वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
बीसीसीआयचा चीफ सिलेक्टर अजित आगरकर म्हणाला की, बीसीसीआयने वनडे कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याचं मी स्वतः रोहित शर्माला सांगितलं. गिल याला रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून नेमला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेद्वारे गिल पर्वाला सुरुवात होणार आहे. हा दौरा १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
रोहित शर्माला वनडे कर्णधारपदावरून हटवण्याच्या निर्णयावरून क्रिकेट जगतातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. टीम इंडिया आणि रोहित शर्माचे चाहते आणि माजी खेळाडूंना तर या निर्णयानं धक्काच बसला आहे. मात्र, इंग्लंडच्या पनेसर यानं बीसीसीआयच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्यामुळं गिलकडून कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ कामगिरी होऊ शकते, असं त्याचं म्हणणं आहे.
पनेसर यानं एएनआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. मला वाटतंय की हा सर्वोत्तम निर्णय आहे. कारण गिलने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. रोहित शर्मा संघात असतानाच त्याला कर्णधार करणं हा समजूतदारपणा आहे. कारण तो त्याला मार्गदर्शन करू शकतो. हे खूप चांगले पाऊल टाकले आहे. गिल हा नॅचरल लीडर आहे हे आम्ही इंग्लंडमध्ये बघितलं आहे, असं पनेसर म्हणाला.
जेव्हा जेव्हा शुभमन गिलला जबाबदारी दिली जाते, त्यावेळी तुम्ही त्याचा सर्वोत्कृष्ट खेळ बघता. आपल्याला या वनडे मालिकेत त्याचा सर्वोत्कृष्ट खेळ बघायला मिळेल, असा विश्वास आहे. भविष्यात त्याला टी २० संघाचं कर्णधारपद दिलं तरी मला आश्चर्य वाटणार नाही. कारण जबाबदारी मिळाल्यानंतर त्याची कामगिरी सर्वोच्च होते, असंही पनेसर म्हणाला. पनेसरच्या या दाव्यामुळं टीम इंडियाच्या चाहत्यांना लवकरच दुसरा धक्का मिळेल, असे बोलले जात आहे. कारण रोहित शर्मानंतर आता सूर्यकुमार यादवचंही कर्णधारपद जाणार का, असा प्रश्न क्रिकेट वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.