
युवा फलंदाज शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघानं पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजवर मोठा विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजला एक डाव आणि १४० धावांनी धूळ चारून या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या विजयाचा आनंद साजरा होत असताना, पदरी निराशा पडली आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये भारताला टॉप २ मध्ये स्थान मिळू शकलेले नाही.
वेस्ट इंडीजवरील विजयानं भारताच्या विजयाचा टक्का वाढला असला तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमधील स्थान काही सुधारले नाही. टॉप २ मध्ये भारताला जागा मिळवता आली नाही. पहिल्या कसोटीतील मोठ्या फरकानं विजय मिळाला असला तरी, भारतीय संघ अजून तिसऱ्याच स्थानी आहे. श्रीलंका दुसऱ्या स्थानी असून, ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे. कारण ऑस्ट्रेलियाच्या संघानं अद्याप कोणताही सामना गमावलेला नाही. तसेच कोणताही सामना अनिर्णित राहिलेला नाही.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याआधी भारताच्या विजयाचा टक्का ४६.६७ इतका होता. आता हा सामना जिंकल्यानंतर त्यात वाढ झाली असून, ५५.५६ टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसरीकडे वेस्ट इंडीजचा संघ या साखळीत अद्याप पहिला विजयही मिळवू शकलेला नाही. वेस्ट इंडीजने आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी १०० आहे. तर श्रीलंकेचे ६६.६७ टक्के आहेत.
इंग्लंडच्या दौऱ्यात 'कसोटी'त खरा उतरल्यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्वाचा वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत कस लागणार होता. त्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. गिल त्यात यशस्वीही झाला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर उत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय संघानं वेस्ट इंडीजवर मोठा विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडीजला भारतीय गोलंदाजांनी दोन सत्रांतच अवघ्या १६२ धावांवर गुंडाळलं. सिराजनं चार तर, बुमराहनं तीन विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघानं ५ विकेट गमावून ४४८ धावा केल्या. भारताकडे २८६ धावांची आघाडी होती. केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी शतके झळकावली. जडेजा नाबाद राहिला. कर्णधार शुभमन गिल यानं अर्धशतकी खेळी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्याआधीच भारतीय संघानं डाव घोषित केला. या निर्णयाला गोलंदाजांनी सार्थक ठरवलं. वेस्ट इंडीजला भारतीय गोलंदाजांनी पुन्हा दोनच सत्रांत अवघ्या १४६ धावांत गुंडाळलं. भारतानं हा सामना एक डाव १४० धावांनी सहज खिशात घातला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.