Summary -
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा जानेवारी २०२७ मध्ये सुरू होणार आहे.
सुरत-बिलीमोरा सेक्शनवर पहिल्यांदा बुलेट ट्रेन धावेल.
संपूर्ण ५०८ किमी मार्ग २०२९ पर्यंत प्रवाशांसाठी खुला होईल.
मुंबई ते अहमदाबाद प्रवास फक्त २ तासांत पूर्ण होणार आहे.
मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी सुरू होणार याची सर्वजण वाट पाहत आहेत. या बुलेट ट्रेनबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार याचे उत्तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे. ५०८ किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरवर धावणाऱ्या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा जानेवारी २०२७ पासून सुरू होईल. पुढील टप्प्यासाठी तुम्हाला दोन वर्षे म्हणजेच २०२९ पर्यंत वाट पहावी लागेल. २०२९ मध्ये तुम्ही मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनने प्रवास करू शकाल अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच घोषणा केली की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन २०२९ पर्यंत सुरू होईल. याचा पहिला टप्पा म्हणजे गुजरातमधील सुरत आणि बिलीमोरा दरम्यान भारतातील पहिला हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर २०२७ पर्यंत खुला होईल. २०२७ मध्ये या ५० किलोमीटरच्या मार्गावर बुलेट ट्रेन धावण्यास सुरुवात होईल.
सूरत बुलेट ट्रेन स्टेशनचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि सध्या त्याचे फिनिशिंगचे काम सुरू आहे. डायमंडच्या आकाराच्या स्टेशनमध्ये वेटिंग लाउंज, नर्सरी, प्रसाधनगृहे आणि किरकोळ दुकाने यासह विविध प्रकारच्या लक्झरी सुविधा आहेत. लिफ्ट आणि एस्केलेटर, विशेष साइनबोर्ड, माहिती कियोस्क आणि सार्वजनिक घोषणा प्रणाली बसवण्यात आली आहे.
बुलेट ट्रेनच्या मदतीने मुंबई ते अहमदाबाद हे ५०८ किमी अंतर फक्त दोन तासांत पूर्ण करता येईल. सध्या या मार्गावर प्रवास करण्यासाठी ९ तासांचा कालावधी लागतो. रेल्वेमंत्र्यांनी नुकताच बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने सुरू होणाऱ्या उद्घाटनाची माहिती दिली. सूरत आणि बिलीमोरा सेक्शन २०२७ पर्यंत, ठाणे-अहमदाबाद सेक्शन २०२८ पर्यंत आणि संपूर्ण मुंबई-अहमदाबाद लाइन २०२९ पर्यंत सुरू होईल.
भारताचा बुलेट ट्रेन प्रकल्प हा सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ताशी ३२० किमी वेगाने धावणारी ही बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हे अंतर फक्त दोन तासांत पूर्ण करणार आहे. या मार्गाचे काही भाग एलिवेटर, काही भूमिगत आणि काही लूप असतील. लूप लाईनवर ट्रेनचा वेग ताशी ८० किमी असेल. सध्या देशभरात धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा कमाल वेग ताशी १८० किमी आहे. जरी ती सध्या ८० ते ९० किमी प्रति तास वेगाने धावते. बुलेट ट्रेन ताशी ३२० किमी वेगाने धावेल ज्यामुळे तुम्हाला प्रवासाच्या थराराची कल्पना येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.