इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे नागरिकांमध्ये संभ्रम
केंद्र सरकारने E20 पेट्रोल स्वस्त नसण्यामागील कारणे सांगितली
केंद्र सरकारने सर्वासामान्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं दिली
इथेनॉलची खरेदी किंमत आणि इतर खर्चामुळे E20 प्रत्येक वेळी शुद्ध पेट्रोलपेक्षा स्वस्त ठरत नाही
केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोलसंदर्भात पुन्हा एकदा लोकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या प्रश्नोत्तरानुसार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले की, इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी आणि तथ्यांवर आधारित स्पष्टीकरण देण्यासाठी केंद्र सरकारने २३ जून २०२६ रोजी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आधीच एक निवेदन जारी केले होते.
वाहन उत्पादकांनीही ४ जुलै २०२६ रोजी एका पत्रकार परिषदेत या इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत स्पष्टीकरण दिले होते. या स्पष्टीकरणानंतरही सर्वसामान्यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत चिंता व्यक्त केल्या होत्या. इथेनॉल टाकल्यानंतरही पेट्रोल स्वस्त का होत नाही? असा एक प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. सर्वसामान्यांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर देत केंद्र सरकारने त्यांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.
इथेनॉल मिश्रित तेल शुद्ध पेट्रोलपेक्षा महाग का असते याबाबत स्पष्टीकरण देताना केंद्र सरकारने सांगितले की, आज भारतीय शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी सरकार वाजवी दरात इथेनॉल खरेदी करत आहे. मक्यापासून बनवलेल्या इथेनॉलचे उदाहरण घ्या. आम्ही खरेदीची किंमत हळूहळू वाढवली आहे आणि आज ती अंदाजे ७१.८६ रुपये प्रति लिटर आहे.
यामध्ये जीएसटी, वाहतूक, साठवणूक आणि डेपो हाताळणी खर्चाचा समावेश नाही. म्हणून जर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे ७० अमेरिकन डॉलर असेल तर E20 चे उत्पादन शुद्ध पेट्रोलपेक्षा प्रत्यक्षात अधिक महाग पडते. जर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १२०-१३० अमेरिकी डॉलरपर्यंत वाढली तर परिस्थिती स्वाभाविकपणे उलटते आणि इथेनॉल आणखी स्वस्त होते.
सरकारने आपल्या निवेदनात असे देखील सांगितले की, तुमचा प्रश्न हा नसावा की 'ई२० स्वस्त का नाही?' खरा प्रश्न हा आहे की 'भारताने ग्राहकांना जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतारांच्या पूर्ण परिणामांपासून कसे सुरक्षित ठेवले आहे?' याचे उत्तर सोपे आहे. आज भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक लिटर पेट्रोलमध्ये सुमारे २० टक्के देशांतर्गत उत्पादित इथेनॉल असते. ते इथेनॉल सुमारे ७१ रुपये प्रति लिटर दराने खरेदी केले जाते. ही अशी किंमत आहे जी दररोज सकाळी ब्रेंट क्रूडच्या किमतीनुसार भू-राजकीय संघर्षांनुसार किंवा वाहतुकीतील व्यत्ययांमुळे बदलत नाही.
इथेनॉलचा तुमच्या इंधन टाकीवर परिणाम होणार नाही असं देखील सरकारने सांगितले आहे. तुमच्या इंधन टाकीचा पाचवा भाग आंतरराष्ट्रीय तेल किमतींमधील चढउतारांपासून संरक्षित असतो. जगभरात सुरू असलेल्या घडामोडींचा भारतातील किरकोळ इंधन दरांमध्ये सर्वात कमी वाढ होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे इथेनॉल मिश्रणाचा उद्देश एखाद्या विशिष्ट दिवशी पेट्रोल स्वस्त करणे हा नाही. तर आयात केलेल्या कच्च्या तेलावरील भारताचे अवलंबित्व कमी करणे हा आहे. यामुळे परिणामी प्रमुख अर्थव्यवस्था आणि शेजारी देशांच्या तुलनेत भारतात गेल्या ४ वर्षांत इंधनाच्या दरात सर्वात कमी वाढ नोंदवली गेली आहे.
कमी आयात केलेले कच्चे तेल
परकीय चलन खर्च कमी
भारतीय शेतकऱ्यांसाठी उच्च उत्पन्न
ग्राहकांसाठी अधिक किमतीची स्थिरता आणि भक्कम राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षा.
परकीय चलनात १.९७ लाख कोटींहून अधिकची बचत झाली आहे.
सुमारे ३१६ लाख मेट्रिक टन कच्च्या तेलाची जागा इथेनॉलमुळे बदलण्यात आली आहे.
सुमारे ९५२ लाख मेट्रिक टन CO₂ उत्सर्जनात घट झाली आहे.
इथेनॉलसाठी भारतीय शेतकऱ्यांना थेट १.६६ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे.
आमचे शेतकरी आता फक्त 'अन्नदाता' राहिलेले नाहीत ते 'ऊर्जादाता' देखील बनले असून भारताच्या ऊर्जा सुरक्षेमध्ये थेट योगदान देत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.