बिहारमध्ये एनडीएने २०२ जागांवर विजय मिळवला
नितीश कुमार २० नोव्हेंबरला १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार
शपथविधी सोहळा गांधी मैदानात पार पडणार आहे
मंत्रिमंडळात भाजपला १६, जदयूला १४, एलजेपीला ३, एचएएम-एसला १ व आरएलएमला १ पद मिळणार
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला मोठं यश मिळाले. एनडीए युतीने २०२ जागांवर विजय मिळवला. तर विरोधी महाआघाडीने ३५ जागांवर विजय मिळवला. एनडीएच्या विजयानंतर फक्त बिहारमध्येच नाही तर राज्यभरात भाजपकडून जल्लोष करण्यात आला. या विजयानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार? आणि शपथविधी सोहळा कधी पार पडणार? याकडे. याबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे. नितीश कुमार हे १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत. ते येत्या २० नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार येत्या २० नोव्हेंबरला बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा शपथविधी सोहळा बिहारच्या गांधी मैदानावर होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, धर्मेंद्र प्रधान, चिराग पासवान, जीतन राम मांझी, योगी आदित्यनाथ आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि मंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील.
या शपथविधी सोहळ्याची तयारी देखील सुरू झाली आहे. रविवारपासून गांधी मैदानावर राज्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली. १७ ते २० नोव्हेंबरपर्यंत गांधी मैदान सर्वसामान्यांसाठी बंद राहील अशी माहिती पाटणा जिल्हा प्रशासनाने दिली आहे. नवीन सरकारच्या शपथविधीसाठी गांधी मैदान ४ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मित्रपक्षांमध्ये मंत्रिमंडळ पदांचे वाटप करण्याचे सूत्र अंतिम झाले आहे. जदयू आणि भाजपसोबत चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील एलजेपी, मांझी यांच्या नेतृत्वाखालील एचएएमएस आणि उपेंद्र कुशवाह यांच्या नेतृत्वाखालील आरएलएम हे छोटे मित्रपक्ष सरकारमध्ये सहभागी होतील. मंत्रिमंडळात एलजेपीला ३ जागा मिळण्याची शक्यता आहे. एचएएम-एस आणि आरएलएम यांना प्रत्येकी १ जागा मिळेल. भाजपला १६ मंत्री आणि जदयूला १४ मंत्री मिळतील. हे सर्वजण देखील २० नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतील.
दरम्यान, बिहारच्या मावळत्या सरकारची शेवटची कॅबिनेट मिटिंग आज सकाळी ११.३० वाजता होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला बिहारच्या जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले. एनडीए युतीला २०२ जागांवर यश मिळाले. यामध्ये भाजपला सर्वाधिक ८९ जागांवर विजय मिळवण्यात यश आले. जदयूला ८५, एलजेपीला १९ जागांवर विजय मिळाला. तर महाआघाडीला ३५ जागांवर विजय मिळवण्यात यश आले. यामध्ये राजदला २५ आणि काँग्रेसला ६ जागांवर यश मिळाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.