Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाणे महापालिका रुग्णालयातील मृत्यू प्रकरणावरुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मात्र अजित पवारांच्या थेट प्रश्नानंतर वाद होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मध्यस्थी करत विषय तिथेच संपवला.
काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यावरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात अशी घटना घडल्याने तेथील आरोग्य विभागाच्या बेजबाबदार कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं.
सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांनाच, तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे होतात? असा सवाल केला. अजित पवार यांच्या अनपेक्षित प्रश्नानंतर बैठकीत काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती बैठकीत सर्वांना दिली. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)
अजित पवारांची आक्रमक कामाची पद्धत सर्वांनाच माहिती आहे. तसेच त्यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षाही लपून राहिलेली नाही. त्यातच अजित पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न केल्याने अजित पवारच सरकारमधील 'दादा' असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे. अजित पवारांच्या या कृतीमुळे शिंदे गटातील मंत्री, आमदारांमध्ये अस्वस्था परसल्याची माहिती समोर येत आहे. (Maharashtra News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.