दिलीप कांबळे, साम टीव्ही
पुणे शहरासह मावळ आणि मुळशी तालुक्यावर पाणीटंचाईचं संकट गडद होत चाललं आहे. पावसाने उशीर केल्यामुळे धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटला प्रशासनाला पाणी कपातीचे निर्णय घ्यावे लागत आहेत. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात साठा कमी झाल्याने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. खडकवासला धरण क्षेत्रात खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांचा समावेश होतो. सध्या या चारही धारणांत मिळून फक्त 4.21 टीएमसी म्हणजेच 14.42 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 5.45 टीएमसी (18.70) होता. विशेष म्हणजे टेमघर धरण पूर्णपणे कोरडे पडल्याची स्थिति आहे.
दरम्यान मावळ आणि मुळशी तालुक्यातील अनेक गावांची तहान भागवणाऱ्या कासारसाई धरणातही केवळ 21 टक्के पाणीसाठा उरला आहे. मान्सूनच्या आगमनाला झालेला विलंब आणि वाढते तापमान यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने महत्त्वाचा निर्णय घेत शेतीसाठी धरणातील पाणी वापरण्यास बंदी घातली आहे. शेतकऱ्यांनी पाऊस पडत नाही तोपर्यंत पाणी वापरू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
नागरिकांनी पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वेळेत पाऊस न झाल्यास येत्या काळात पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कुठे, किती पाणीसाठा शिल्लक?
खडकवासला- ०.८० टी एम सी
पानशेत- १.९० टी एम सी
वरसगाव- १.५१ टी एम सी
टेमघर- ० टी एम सी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.