पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्याने आत्महत्या केली
प्रथमेश देशमुख असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होते
आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने सुसाइड नोट लिहिली होती
अडीच लाखांच्या कर्जामुळे तरुणाने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे
एमपीएससी पेपरफुटीचा मुद्दा सध्या चांगला गाजत आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक अडचणीतून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. प्रथमेश देशमुख असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव होते. या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश देशमुख हा तरुण एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली होती. त्यामुळे त्याने आत्महत्येमागचं कारण लिहिले. आत्महत्या करणाऱ्या प्रथमेशवर अडीच लाखांचे कर्ज होते. प्रथमेश धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथील रहिवासी होता. प्रथमेशने लिहिलेल्या सुसाइड नोटच्या आधारे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी पुण्यातील नारायण पेठ पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रथमेशच्या आत्महत्येप्रकरणी एमपीएससी विद्यार्थी प्रतिनिधी किरण निंभोरे यांनी सांगितले की, 'आत्महत्या करणारा प्रथमेश देशमुख हा तरुण २ दिवसांपूर्वी गावाला गेला होता. शेतातील सोयाबीन पूर्ण जळाले असल्याने तो तणावात होता. त्याच्या नातेवाईकांनी ही माहिती दिली. एका बाजूला दुष्काळ आणि दुसऱ्या बाजूला एमपीएसीमध्ये होत असलेली पेपरफुटी यामुळे प्रथमेश चिंतेत होता. शेतकऱ्याची जास्तीत जास्त मुले एमपीएससी करण्यासाठी येत असतात. मात्र वेळेवर होत नसलेली परीक्षा आणि एमपीएससी होत असलेले पेपरफुटी यामुळे प्रथमेश देशमुख हा विद्यार्थी तणावात होता अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.'
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी पवन वाबळेने सांगितले की, 'एकीकडे एमपीएससीचे पेपर फुटले जात आहेत तर दुसरीकडे मराठवाड्यात दुष्काळ पडला आहे. प्रथमेशच्या शेतातला सोयाबीन जळून गेल्यामुळे ज्या शेतावर त्याला पैसे येणार होते ती आशा संपली होती. प्रथमेशचे वडील वारले असून ४ बहिणी आणि आई असा त्यांचा आधार होता. राज्य सरकारला आवाहन आहे की, शेतकऱ्यांकडे तरी लक्ष द्या पण शेतकऱ्यांच्या मुलांकडे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडे देखील लक्ष दिले पाहिजे. एकीकडे दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि दुसरीकडे एमपीएससीच्या पेपर फुटी होत आहे यावर राज्य सरकारने तातडीने पाऊलं उचलली पाहिजे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.